किरणोत्सर्गी अस्त्रांचा भारतीय सैनिकांच्या विरोधात वापर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गलवान खोऱयात काळोखात भारतीय सैनिकांवर काटेरी लाठय़ांनी हल्ला करणाऱया चीनच्या सैन्याने लडाखमध्ये अनेक नव्या घातक शस्त्रांचा वापर केल्याचा खुलासा झाला आहे. पीएलएने पूर्व लडाखमध्ये भारतीय सैनिकांना मागे रेटण्यासाठी किरणोत्सर्ग निर्माण करणारी अत्यंत घातक किरणे सोडली होती, असा दावा चीनच्याच एका तज्ञाने केला आहे. ही बाब खरी असल्यास जगात शत्रू सैन्याच्या विरोधात अशा प्रकारच्या अस्त्राच्या वापराचे हे पहिलेच प्रकरण आहे. एकही गोळी न झाडता झालेल्या या हल्ल्यानंतर भारतीय सैनिक दोन शिखरांवरून मागे हटल्याचा दावा चिनी तज्ञाने केला आहे.
चीनच्या या घातक अस्त्रामध्ये मायक्रोवेव किरणांचा वापर केला जातो, याच्या तावडीत सापडताच सैनिकाला भीषण वेदना आणि तैनात राहण्यास त्रास होऊ लागतो, असे बीजिंगमधील रेनमिन विद्यापीठातील प्राध्यापक जिन कानरोंग यांनी म्हटले आहे. भारत आणि चीन यांच्यात 1996 मध्ये झालेल्या करारानुसार अशाप्रकारच्या घातक अस्त्रांचा वापर प्रतिबंधित आहे. गलवान येथील क्रौर्यानतंरही भारतीय सैनिकांचा मनोबळ विचलित करू न शकलेल्या चिनी सैन्याने भारतीयांच्या विरोधात या क्रूर अस्त्राचा वापर केला आहे.
मायक्रोवेन गनच्या वापराने 15 मिनिटानंतरच भारतीय सैनिक उलटय़ा करू लागले आणि त्यांना शिखर सोडून मागे हटावे लागल्याचा दावा जिन यांनी केला आहे. जगात अशाप्रकारच्या अस्त्राचा स्वतःच्या शत्रू सैन्यावर वापर करण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. चीनचे हे अस्त्र माणसांना तडफडविण्यासह इलेक्ट्रॉनिक आणि क्षेपणास्त्र यंत्रणाही नष्ट करू शकते.