प्रतिनिधी/ बेळगाव
तांत्रिक कारणाने चेन्नई व पुणे या दोन शहरांच्या विमानसेवा फेब्रुवारी महिन्यापासून बंद आहेत. चेन्नई शहरासाठी सुरू करण्यात आलेली विमानसेवा अवघ्या महिन्याभरात बंद करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या दोन्ही शहरांच्या विमानसेवा पूर्ववत करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
अलायन्स कंपनी पुणे-बेळगाव-बेंगळूर व बेंगळूर-बेळगाव-पुणे या मार्गावर विमानसेवा देते. परंतु तांत्रिक कारण देत कंपनीने या दोन्ही फेऱया जानेवारी अखेरपासून बंद केल्या आहेत. यामुळे पुणे व बेंगळूरला जाणाऱया प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. यामुळे पुणे व बेंगळूर या दोन्ही मार्गांवर अलायन्स एअरने आपली सेवा पूर्ववत करण्याची मागणी करण्यात येत आहे.
अवघ्या महिन्याभरात विमानसेवा बंद
मोठा गाजावाजा करीत इंडिगोने बेळगाव-चेन्नई ही विमानफेरी 21 जानेवारीपासून सुरू केली. आठवडय़ातून 3 दिवस ही फेरी सुरू ठेवण्यात आली होती. परंतु प्रवासी संख्या कमी असल्याचे कारण देत 19 फेब्रुवारीपासून ही विमानफेरी बंद करण्यात आली. अवघ्या महिन्याभराच्या आतच फेरी बंद करण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. प्रवाशांना चेन्नईला थेट विमानफेरी सुरू झाल्याचे समजण्याच्या आतच ही विमानफेरी बंद करण्यात आली आहे.
राजेशकुमार मौर्य (संचालक, बेळगाव विमानतळ)
सध्या अलायन्स एअरची पुणे व बेंगळूर व इंडिगोची चेन्नई विमानसेवा बंद आहे. यातील अलायन्स एअरच्या विमानसेवा येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येणार आहेत. इंडिगो कंपनीच्या व्यवस्थापकांशी पत्रव्यवहार करून सेवा पूर्ववत करण्याबाबत चर्चा करण्यात येत आहे. चेन्नईला जाण्यासाठी सध्या ट्रुजेट कंपनीचे विमान म्हैसूरमार्गे सेवा देत असल्याचे त्यांनी सांगितले.