जांबेटी-कणकुंबी भागातील नागरिकांचा बैठकीत निर्णय : पर्यावरणवादी उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत
वार्ताहर /जांबोटी
बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गाचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात करण्यात येणार असून यासाठी 220 कोटीचा निधी मंजूर होऊन निविदाही काढण्यात आली आहे. मात्र रस्त्याच्या विकासामुळे पर्यावरणाचा ऱहास होण्याची सबब पुढे करून पर्यावरणवादी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. गेल्या महिन्याभरापूर्वी सुरू होणारे रस्त्याचे काम स्थगित झाल्यामुळे या रस्त्याची समस्या मार्गी लागावी, या उद्देशाने शुक्रवारी हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्रावर झालेल्या नागरिकांच्या बैठकीत चोर्ला रस्त्याच्या विकासासाठी संघटित लढा देण्याचा निर्धार जांबोटी, कणकुंबी भागातील नागरिकांनी केला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवप्रति÷ानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे होते.
प्रारंभी आमटे ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश सांगितला. तसेच या रस्त्याच्या विकासासाठी जांबोटी, कणकुंबी भागातील सर्व ग्रामपंचायतींनी एकमुखाने ठराव मांडून रस्ताप्रश्नी सरकारचे लक्ष वेधण्याचे आवाहन केले.
संघटितपणे लढा देण्याची गरज
यावेळी बोलताना किरण गावडे म्हणाले की, बेळगाव-चोर्ला मार्गाने बेळगाव-गोवा हे अंतर 40 किलोमीटरने कमी होते. यामुळे बेळगावहून गोव्याला जाणाऱया नोकरदार, व्यावसायिक तसेच पर्यटकांना हा रस्ता सोयीचा आहे. या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले असल्याने दुर्गम भागातील जांबोटी, कणकुंबी विभागाचा झपाटय़ाने विकास होणार आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र पर्यावरणाचा ऱहास होण्याची सबब पुढे करून पर्यावरणवाद्यांनी विकासकामात अडथळा आणू नये. त्यांनी या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन, तसेच या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन सामंजस्यसपणे महामार्ग प्राधिकरणाकडे तसेच पर्यावरण लवादाकडे दाखल केलेली तक्रार त्वरित मागे घेऊन चोर्ला रस्त्याच्या विकासाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा या भागातील जनता गप्प बसणार नाही. या रस्त्यासाठी सर्वांनी संघटित होऊन लढा देण्याची गरज असल्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा पंचायत माजी सदस्य जयराम देसाई, राजू कांबळे, रवी महाजीक, अण्णासाहेब कुडतुरकर, दत्तात्रय देसाई, तालुका पंचायत माजी सदस्य चिदंबर गावकर, हणमंत जगताप आदींनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात विचार व्यक्त केले.
बैठकीला खानापूर तालुका म. ए. समितीचे माजी अध्यक्ष विलास बेळगावकर, तालुका पंचायत माजी सदस्य पुंडलिक पाटील, आम आदमी पक्षाचे खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील, ग्राम पंचायत माजी सदस्य गणपती सावंत, अनंत गावडे, सखाराम धुरी, काळू नाईक, भिमा कवठणकर, मारुती गावडे, भास्कर पाटील, विनायक कोकीतकर, महेश जाधव, दर्शन नाईक, बाबू ओऊळकर यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. संतोष कदम यांनी आभार मानले.