खानापूर / प्रतिनिधी
हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्याविरुद्ध फेसबुक व इन्स्टाग्रामद्वारे अवमानीत संदेश पाठवणाऱया समाजक कंटकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली हिंदू संघटनांच्यावतीने सोमवार दि. 31 रोजी खानापूरच्या तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांना देण्यात आले. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बेळगाव व सायबर क्राईम बँचलाही पाठवण्याची विनंती यावेळी करण्यात आली. तत्पूर्वी लक्ष्मी मंदिरापासून हिंदू संघटनांच्या मोर्चाला सुरुवात झाली. मार्गामध्ये त्या समाज कंटकाविरुद्ध निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यानंतर सदर मोर्चा तहसीलदार कार्यालयासमोर पोहोचला.
यावेळी बोलताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले, काही विघटनवादी लोक हिंदू धर्मीयात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांपासून हिंदू धर्मीयानी सावध रहावे, व अवमानास्पद संदेश देणारे कृत्य अत्यंत निदंनीय असून त्या समाजकंठकाचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे असून याची प्रशासनाने दखल घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली.
तालुका अध्यक्ष संजय कुबल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे प्रकार आम्ही कधीही सहन करू शकणार नाही. त्या व्यक्तींचा शोध लावून त्यांना कडक शासन करावे, अशी मागणी केली.
यावेळी पंडित ओगले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजानी हिंदू धर्म संस्कृतीच्या रक्षणासाठी महान कार्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज हिंदू संस्कृती टिकून राहिली आहे. काही समाजकंटक अशा महनीय राष्ट्रपुरुषाचा फेसबुकद्वारे संदेश पाठवून अवमान करत आहेत. यामुळे समस्य हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या असून प्रशासनाने यामध्ये सहभागी झालेल्यांचा वेळीच बिमोड करावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी ऍड. आकाश अथणीकर, यशवंत गावडे यांनी देखील आपले विचार व्यक्त करुन तीव्र शब्दात निषेध केला. यानंतर तहसीलदाराना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी नगरसेवक विनायक कलाल, हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.