ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जगभरातील 12 देशांमध्ये अडकलेल्या 14 हजार 800 भारतीयांना विशेष विमानांनी मायदेशी आणण्यात येणार आहे. भारताचे नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
येत्या 7 मे पासून या सेवेला प्रारंभ होणार असून, 14 मे पर्यंत विमानांच्या 64 फेऱ्यांमध्ये हे भारतीयांना मायदेशी परततील. लॉकडाऊनमुळे युएई, कतार, सौदी अरेबिया, यूके, सिंगापूर, युनायटेड स्टेट्स, फिलीपिन्स, बांगलादेश, बहरीन, मलेशिया, कुवेत आणि ओमान या 12 देशात 14 हजार 800 भारतीय नागरिक अडकून पडले आहेत.
एका विमानात दोनशे ते तीनशे लोकांना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे युएई- 10, कतार- 2, सौदी अरेबिया- 5, यूके- 7, सिंगापूर- 5, युनायटेड स्टेट्स -7, फिलीपिन्स- 5, बांगलादेश- 7, बहरीन – 2, मलेशिया -7, कुवेत -5, ओमान -2 आशा विमान फेऱ्यांमधून परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यात येईल, असेही हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले.