हुरुन ग्लोबल यांच्या अहवालातून माहिती
वृत्तसंस्था / मुंबई
जगातील सर्वात मूल्यवान 500 कंपन्यांच्या यादीमध्ये भारतामधील 11 कंपन्यांचा समावेश झाला आहे. सदरच्या कंपन्या या खासगी असून भारताचे स्थान हे दहावे आहे, अशी माहिती हुरुन ग्लोबल 500 यांच्या अहवालातून देण्यात आली आहे.
सदरच्या 11 कंपन्यांचे मूल्य 14 टक्क्यांनी वधारुन 805 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. हा आकडा भारतीय अर्थव्यवस्थेच्या तुलनेत एक तृतीयांश असून या सर्व कंपन्यांची आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे 2020 मधील कोरोना कालावधीतही या कंपन्यांच्या मूल्यात वाढ नोंदवण्यात आली आहे. साधारणपणे आयसीआयसीआय बँक आणि आयटीसीच्या मूल्यांकनात मात्र घसरण नोंदवली असल्याचे हुरुन ग्लोबल 500 च्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
अव्वल मूल्यांकनातील प्रमुख कंपन्या
1. रिलायन्सचे मूल्य 25 टक्क्यांनी वधारले ः मुकेश अंबांनी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने भारतीय कंपन्यांमध्ये सर्वात मूल्यवान कंपनी ठरली असून यांचे मूल्यांकन 2020 मध्ये 20.5 टक्क्यांनी वधारुन 168.8 अब्ज डॉलर्स झाले आहे. वर्गवारीच्या प्रमाणात पाहिल्यास तर रिलायन्स जगातील 54 वी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. यापाठोपाठ टाटा सूमहाची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस दुसऱया स्थानी आहे. याचे मूल्य 30 टक्क्यांनी वधारुन 139 अब्ज डॉलर्सवर पोहोचले असून ही यादीत 73 व्या स्थानावर राहिली आहे.
2. एचडीएफसी बँकेचे मूल्य 107.5 अब्ज डॉलर ः ही देशातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. यांचे मूल्य 11.5 टक्क्यांनी वाढून 107.5 अब्ज डॉलर्सवर राहिले आहे. हिंदुस्थान युनिलिव्हरचे मूल्यांकन 68.2 अब्ज डॉलर्स आहे. इन्फोसिसचे मूल्य 66 अब्ज डॉलर्सवर राहिले आहे.
3. कोटक महिंद्रा बँकेचे मूल्य 50.6 अब्ज डॉलर ः कोटक महिंद्रा बँकेचे मूल्यांकन 50.6 अब्ज डॉलर्सवर राहिले आहे. याचे मूल्य मागील वर्षात 16.8 ने वधारले आहे. तसेच आयसीआयसीआय बँकेचे मूल्यांकन अर्ध्या टक्क्यांनी कमी झाले आहे. याचे मूल्य 45.6 अब्ज डॉलर्सवर असून कंपनी 316 व्या स्थानावर आहे.
भारतामध्ये 239 कंपन्या बाहेरील
उपलब्ध अहवालानुसार 239 कंपन्या या अशा आहेत, की त्यांचे कॉर्पोरेट कार्यालय भारतामध्ये नसून फक्त व्यवसाय देशात केला जातो. या कंपन्यांची देशातील प्रमुख शहरांमध्ये विभागीय कार्यालये आहेत. देशातील 11 सर्वोच्च मूल्यवान कंपन्यांमध्ये 7 कंपन्यांचे मुख्यालय हे मुंबईमध्ये आहे. तसेच बेंगळूर, पुणे, कोलकाता आणि नवी दिल्ली येथे एक-एक कार्यालय आहे.