प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे श्रीस्थळ येथे कार्यकर्त्यांना आवाहन
प्रतिनिधी /काणकोण
काँग्रेसचे सरकार हे जनतेचे सरकार असेल. जनतेला धोका देऊन भाजपाने सरकार स्थापित केले, भाजपाने जनतेचा विश्वासघात केला. जनतेने ज्या पक्षाला कौल दिला त्याच पक्षाला बदनाम करण्याचा सपाटा सध्या भाजपाने लावला आहे. आमजनतेची फसवणूक करणाऱया या पक्षाला धडा शिकविण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी संघटित व्हावे, असे आवाहन प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी श्रीस्थळ पंचायत सभागृहात काणकोण गट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना केले.
या बैठकीच्या व्यासपीठावर पक्षाचे सरचिटणीस जनार्दन भंडारी, गटाध्यक्ष प्रलय भगत, प्रवक्त्या पल्लवी भगत, युरी आलेमाव, दक्षिण गोवा काँग्रेस समितीचे सरचिटणीस सिद्धार्थ नाईक, माजी जिल्हा पंचायत सदस्य दया पागी, गावडोंगरीचे माजी सरपंच राजेंद्र वेळीप, सचिव महादेव देसाई, अजय पागी, उदय गावकर, राजेश वेळीप, पंच रामू नाईक, दयानंद देसाई, चंपा पागी, मनीषा भंडारी, उर्मिला कॉस्ता, क्विन्सी फर्नांडिस, मिल्टिया फर्नांडिस यांची उपस्थिती होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना करतानाच कार्यकर्त्यांना जागरूक करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
जनार्दन भंडारी, महादेव देसाई, प्रलय भगत, युरी आलेमाव, पल्लवी भगत यांनी आपल्या भाषणात पक्ष संघटनेवर भर दिला. त्याचबरोबर काणकोणचा विकास खंडित होण्यास विद्यमान आमदार इजिदोर फर्नांडिस तसेच माजी मंत्री रमेश तवडकर व माजी आमदार विजय पै खोत कारणीभूत असल्याचा आरोप केला. भाजपने जातीपातींचे राजकारण करून गोव्याचा सत्यानाश केला. भाजप सत्ता मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जातो. फोडा आणि राज्य करा ही नीती त्यांनी अवलंबविली आहे. काँग्रेसने कधीच सत्तेसाठी दोघांमध्ये भांडण लावले नाही. त्यामुळे येणाऱया निवडणुकीत भाजपाला गोव्याची जनता त्यांची जागा दाखविणार असल्याचे मत त्यांनी मांडले.