मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांची माहिती : किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत
प्रतिनिधी /पणजी
राज्य विधानसभेसाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत गोमंतकीयांनी उत्स्फूर्ततेने सहभाग घेत सुमारे 80 टक्के मतदान केले. वाहनांना आगी लावणे, बाचाबाची आणि हातघाई यासारख्या काही किरकोळ घटना वगळता अत्यंत शांततामय वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणुकीने जनतेत कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्या सोबत पोलीस महानिरीक्षक राजेश कुमार यांची उपस्थिती होती.
उत्तर गोव्यात 79.84 टक्के तर दक्षिणेत 78.15 टक्के मतदान नोंद झाले आहे. त्यातील उत्तरेत मुख्यमंत्र्यांच्या सांखळीत सर्वाधिक 89.64 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यामुळे सर्वांच्या नजरा या मतदारसंघाकडे लागल्या आहेत. दक्षिणेत बाणावली मतदारसंघात सर्वात कमी 70.02 टक्के मतदान नोंद झाले आहे,
राज्य विधानसभेसाठी काल दि. 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत एकूण 301 उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यातील सर्वाधिक 13 जण शिवोलीत तर त्याखालोखाल 12 जण सांखळी मतदारसंघात होते. पाच मतदारसंघात सर्वात कमी प्रत्येकी पाच उमेदवार होते. या सर्वांसाठी एकुण 11.64 लाख मतदार मतदान करणार होते. त्यातील अंदाजे 78.94 टक्के मतदारांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन आपल्या आवडत्या उमेदवारासाठी कौल दिला.
धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता
सध्यातरी हा कौल गुप्त असला तरी ’दै. तरुण भारत’च्या संपूर्ण टीमने बहुतेक मतदारसंघात भेट देऊन मतदारांच्या मनाचा कानोसा घेण्याचे प्रयत्न केले असता ’न भूतो’ असे धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता दिसून आली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सांखळी मतदारसंघात तब्बल 12 उमेदवार रिंगणात होते. तरीही मुख्यमंत्र्यांना जवळचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांच्याशीच तगडा सामना करावा लागला आहे. अन्य कोणताही उमेदवार या मतदारसंघात स्वतःची छाप पाडू शकलेला नाही. त्यामुळे या थेट लढतीत कोण बाजी मारतो? मुख्यमंत्री विजयाची हॅट्ट्रीक साधतात की सगलानी यांचे भाग्य उजळते ते पाहण्यासाठी प्रत्येकजण औत्सुक्याने प्रतीक्षा करत आहे.
किरकोळ घटना वगळता, निवडणूक शांततेत पार
दरम्यान, राज्यात मतदानाच्या दिवशी काल काही किरकोळ घटना नोंद झाल्या असून त्यात डिचोलीत एका भाजप समर्थक उद्योजक वल्लभ साळकर यांच्या आलिशान कारला पहाटे आग लावण्याचा प्रकार घडला. सुमारे 18 लाख रुपये किंमतीची ही कार पूर्णतः खाक झाली आहे. त्याप्रकरणी अज्ञाताविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फोंडय़ात पैसे वाटण्यावरुन धक्काबुक्की
अन्य एका घटनेत फोंडा मतदारसंघात बाबल्याखळी बुथवर मगो उमेदवार केतन भाटीकर आणि एक महिला व युवक यांच्यात मतदारांना पैसे वाटपावरून बाचाबाची झाली. त्यातून धक्काबुक्की व तरूण आणि महिलेवर लाठीने हल्ला करण्यात आला. पीडितांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. अशी तक्रार करण्यात आली. परंतु भाटीकर यांनी सदर आरोप फेटाळून लावला. आरोप सिद्ध झाल्यास आपण राजकारण सन्यास घेऊ, असे थेट आव्हानही त्यांनी दिले.
दिगंबर कामत, आजगावकर यांच्यात राडा
मडगावात मोतीडोंगर येथे काँग्रेस उमेदवार दिगंबर कामत आणि भाजपचे बाबू आजगावकर यांच्या समर्थकात जोरदार राडा झाला. त्यामुळे काही काळ तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी खुद्द उमेदवार आजगावकर यांनी संताप व्यक्त करत तेथील पोलीस निरीक्षकास जाब विचारून जोरदार निषेध व्यक्त केला. या प्रकरणी नंतर प्रतिक्रिया देताना दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर ’नैराश्यपूर्ण मनस्थितीत’ बोलत असल्याचे आरोप केले.
नावेलीत पैसे वाटल्याचा आरोप
नावेलीत गृहनिर्माण वसाहत परिसरात तृणमूलच्या उमेदवार वालांका आलेमाव यांच्या भगिनी मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप आपच्या उमेदवार प्रतिमा कुतिन्हो यांनी केला. पणजीचे उमेदवार बाबूश मोन्सेरात आणि उत्पल पर्रीकर यांच्या समर्थकांमध्येही मळा भागात बाचाबाची झाल्याचे वृत्त होते. काणकोण येथे गावडोंगरी मतदान केंद्रावर भाजप उमेदवार रमेश तवडकर यांच्या समर्थकांमध्ये गोंधळ निर्माण झाला.
फोंडा मतदारसंघात एका मतदाराने स्वतः मतदान केल्यानंतर ईव्हीएमचे छायाचित्र घेतले. त्यामुळे त्या व्यक्तीविरोधात लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला.
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत 298 सेवा मतदार, 9590 विशेष क्षमतेचे मतदार, तर 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे 29797 मतदार होते. निवडणूक आयोगाने प्रथमच अशा वयोवृद्ध मतदारांसाठी घरबसल्या मतदान करण्याची व्यवस्था केली होती. 13115 जणांनी त्यासाठी नोंदणी केली होती व प्रत्यक्षात 12546 मतदारांनी या व्यवस्थेद्वारे मतदान केले.
निवडणुकीसाठी 21 सर्वसाधारण निरीक्षक, 9 खर्च निरीक्षक, 5 पोलीस निरीक्षक, 310 मायक्रो निरीक्षक, 8610 निवडणूक अधिकारी आणि 1885 राखीव कर्मचारी तैनात करण्यात आले होते. 2017 मध्ये गोव्यात 82.62 टक्के मतदान झाले होते. 2022 मध्ये ती टक्केवारी 78.94 टक्के म्हणजेच किमान 3 टक्के कमी नोंदविली गेली आहे. या निवडणूक प्रक्रियेदरम्यान अबकारी, खर्च निरीक्षक, पोलीस यांनी एकूण 12.72 कोटी रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले. त्यात रोख 6.65 कोटी रकमेचाही समावेश होता.