लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल झाल्यानंतरच कामकाजाला होणार सुरुवात
प्रतिनिधी/ बेळगाव
जन्म-मृत्यू दाखल्यासाठी मनपाकडे अर्ज केले आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे दाखले वितरणाचे काम बंद ठेवण्यात आले आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे सोमवारी नागरिकांनी जन्म-मृत्यू दाखल्यासाठी मनपा कार्यालयात रांग लावली. पण लॉकडाऊन पूर्णपणे मागे घेतल्यानंतरच दाखले वितरीत करण्यात येणार आहेत. तसेच येत्या चार दिवसात प्रलंबित अर्ज निकालात काढण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जन्म-मृत्यू दाखले वितरणाचे कामदेखील बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे दीड महिन्यापासून नागरिकांना दाखले मिळाले नाहीत. तसेच रुग्णालयाकडून आलेली माहिती नोंद करण्याचे काम सुरू आहे. सरकारी कार्यालये सुरू करण्याचा आदेश शासनाने दिला आहे. तसेच लॉकडाऊन शिथिल झाल्याने जन्म-मृत्यू दाखले घेण्यासाठी नागरिकांनी मनपा कार्यालयाकडे धाव घेतली. पण सध्या परप्रांतीयांचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. जन्म-मृत्यू दाखले वितरण विभागात देखील परप्रांतीयांसाठी काऊंटर सुरू केले आहे. त्या नागरिकांची रांग सोमवारी जन्म-मृत्यू दाखले वितरण कक्षासमोर लागली होती. त्यामुळे दाखले घेण्यासाठी आलेले नागरिक देखील त्या रांगेत उभे राहिले. पण दाखले वितरणाचे काम अद्याप सुरू नसल्याची माहिती दिल्यानंतर ते नागरिक माघारी परतले.
सध्या परप्रांतीयांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने कार्यालयीन कामकाजास सुरुवात करण्यात आली नाही. परप्रांतीयांचे अर्ज भरण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रारंभी प्रलंबित अर्ज निकालात काढण्यात येणार आहेत. दाखले तयार झाल्यानंतर नागरिकांना संपर्क साधण्यात येणार आहे. तसेच लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल झाल्यानंतर जन्म-मृत्यू दाखले वितरणाचे काम सुरळीतपणे सुरू होणार आहे. दररोज केवळ 50 अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.