प्रसिद्ध नाटककार, पत्रकार आणि लेखक-विचारवंत जयंत पवार यांनी वयाच्या 61 व्या वषी अखेरचा श्वास घेतला. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा खंदा पुरस्कार आणि आणि ते स्वातंत्र्य ‘सिलेक्टिव्ह’ असू नये यासाठी प्रसंगी स्वतःलाही तपासून पहा असे सांगण्याचे धाडस असणारा विचारवंत महाराष्ट्राने गमावला आहे. गिरणगावात जन्मून तिथले अस्सल अनुभव त्यांनी आपल्या नाटक, एकांकिका, कथा आणि समीक्षेतही मांडले. मुंबईच्या उंच उंच टॉवरवर एकाकीपणे स्वतःच्याच आयुष्याशी झुंजणाऱया अगतिक मराठी माणसाच्या मनातील प्रत्येक भावना त्यांच्या साहित्यातून व्यक्त झाली. महानगरीय वातावरणात माणसाचे अधःपतन भारतीयांनी अनुभवले ते सत्यजित रे यांच्या चित्रपटातूनच. त्याहून अधिक तीव्रपणे जयंत पवार यांनी मराठी रंगभूमीवर ते अधःपतन मांडले. लेखक म्हणून नाटक हे त्यांचे सर्वात सशक्त माध्यम होते हे त्यांच्या 1998 मध्ये आलेल्या ‘अधांतर’ नाटकातून दिसते. मराठी नाटक जेव्हा सुखाच्या मेलडीवर डोलत होते त्याच काळात दुःख म्हणजे काय असतं? हे वास्तव त्यांनी दाखवले. मराठी साहित्य आणि नाटकाला केवळ पचणारं तत्वज्ञान भरवण्याच्या भानगडीत न पडता वास्तवाची कडवट गोळी देऊन त्यांनी त्या प्रेक्षकांना हादरवून सोडलं. आतापर्यंत संगीत, मुक्तछंदात्मक, हलकंफुलकं, फार्सिकल, वैचारिक, कौटुंबिक ऐतिहासिक, अतिनाटय़, मनोविश्लेषणात्मक, तत्त्वचिंतनात्मक अशाला त्या चौकटीसह आडवे करत जयंत पवार यांनी आपल्या शैलीचं वास्तव नाटक रंगभूमीला देऊ केलं. लेखकाने ओरडून सांगून कोणी ऐकणार नाही म्हणून रंगभूमीवर रक्त आणलं आणि त्या गिरणगावच्या रक्तात आपले हात रंगले आहेत याची जाण समाज शासन-प्रशासन सर्वांना करून दिली. आज जेव्हा या चाळकऱयांना घर देण्याच्या घोषणा होतात तेव्हा ते राज्यकर्त्यांचे पापक्षालन ठरते ते यामुळेच. हे पाप ही तत्कालीन समाजाच्या वाटय़ात घालण्याचे धाडस जयंत पवार यांनी केले. म्हणूनच त्यांचे लेखन हे ‘सिलेक्टिव्ह’ झाले नाही. पवारांचे एकूणच लेखन मराठी रसिक आणि प्रेक्षकाला गिरणगावच्या त्या वास्तव कामगार चाळीत घेऊन गेले. बंद गिरणीच्या कलेवरासमोर माणसांचं कसं सरपटणे आणि जंतू बनवून जगणे सुरू आहे ते दाखवले. अवास्तव स्वप्नांच्या तो कधी मागे लागतो, कधी लढतो, कधी पराभूत होतो तर कधी त्याला आनंदही प्राप्त होतो हे सगळं त्यांनी क्षमतेने लिहिले. ते पाहताना, वाचताना रसिकाला ना नाकाला हात लावण्याची उसंत मिळाली, ना डोळे मिटण्याची. वास्तवापासून मान फिरवण्याचीही संधी न देता त्यांनी ते कलेवर त्याच्या पुढय़ात ठेवले. गिरण गावातीलच मध्यमवर्गीयांच्याही खालचे जगणे जे त्यानी अनुभवले त्याची आग, राग, धग कोणापाशी व्यक्त न करता लेखक म्हणून ते स्वतः एकाकीपणे त्या विचारांच्या लाटा मनात झेलत, भरती-ओहोटीला व्यक्त होत राहिले. त्यातून जे जिवंत रसरशीत साहित्य निर्माण झाले त्यात अण्णाभाऊ साठे यांच्या वास्तवाची झाक, नामदेव ढसाळांचा विद्रोह, बाबुराव बागुलांची कोंडी आणि नाटककार तेंडुलकरांची तगमग दिसून येते. पण, या सर्वांहून स्वतःची शैली वेगळी ठेवणारे आणि त्याला स्वतःच्या चिंतनाने एक उंची प्राप्त करून देणारे जयंत पवार म्हणूनच वेगळे ठरतात. मराठीने आपले हे आगळेवेगळेपण गमावले आहे. 1978 पासून 2015 पर्यंत ते लिहितच राहिले. ‘मोरी निंद नसानी होय’ हा त्यांचा अखेरचा कथासंग्रह. अगदी अलीकडेच 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल यांना त्यांची मते मांडण्यास मज्जाव करण्यात आला तेव्हा आणि ‘तथागत’ तसेच ‘रोमिओ रविदास और जुलिएट देवी’ या नाटकांच्या प्रयोगा वेळी पोलीस चौकशीला जयंत पवारांनी आव्हान दिले. या घटनांचा तुम्ही निषेध कराल का? असा प्रश्न त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने इतर वेळी बोलणाऱयांना अगदी उघडपणे केला! पुरस्कार वापसीच्या बाबतीत त्यांनी स्वतःची वेगळी भूमिका मांडली. पुरस्कार नाकारण्यापेक्षा विचाराने लढा देण्याचा आग्रह त्यांनी केला. सहगल यांचा मुंबईत बोलावून सत्कार, मुलाखत आणि बहुधा त्या समारंभात त्यांचं भाषण जे पवार मंचावर असताना प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी अतुल पेठे यांना वाचायला लावलं होतं, ते विचारच यापुढच्या काळात त्यांची वाट चालणाऱया प्रत्येकाला मार्गदर्शन करणारे ठरतील. ‘ज्यांना आवाज आहे त्यांनी बाळगलेले मौन म्हणजे व्यवस्थांना सामान्य माणसाच्या लुटीचा परवाना ठरतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे केवळ हितसंबंध दुखावलेल्यांच्यासाठी उठवलेला आवाज नव्हे तर प्रत्येक व्यक्तीच्या अभिव्यक्तीसाठी परजलेले हत्यार आहे. या व्यक्तीचा शत्रू कोणत्यातरी पक्षात, संघटनेच्या कार्यालयात, संसदेत, मंत्रालयात बसलेला नव्हे कदाचित आपल्या शेजारी आणि स्वतःतही असू शकतो. मोठी गढी, मठांच्या व्यवस्थेने आता ते दिसूच नयेत अशा उंच भिंती उभ्या केलेल्या आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी अभावग्रस्तांच्या फौजा उभ्या केल्या आहेत. ज्या अभावग्रस्तांसाठी आपण लढत होतो. तुम्हाला तुमच्याच विरोधात लढत ठेवण्याची ही युक्ती समजून घ्या. गो मांसासाठी जीव गमावणारा मुस्लिम आणि त्याला जाळून व्हिडिओ बनवणारा हिंदू दोघेही तितकेच अभावग्रस्त आहेत. व्यवस्थांनी एकाला देशद्रोही आणि दुसऱयाला देशभक्त ठरवले. राष्ट्रवादाची अदृश्य पोलादी भिंत दोघात उभी केली जाते, ज्याच्यापुढे गरिबी, बेकारी, स्थलांतर असे प्रश्न दिसेनासे होतात. ही भिंत आता इतकी उंच झालेली आहे की, हिमालयाकडून शत्रू येण्याची आवई उठली तरी देशांतर्गत युद्धाचा भडका उडेल. अशावेळी अभिव्यक्तीची लढाई गुंतागुंतीची होणार असली तरी आधी आपसातील या भिंती तोडून एक होण्याची गरज आहे. हे त्यांचे विचार समकालातील इतरांपेक्षा वेगळी आणि गरजेची मांडणी करतात. बुलडाण्याच्या तेराव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी पहिल्या संमेलनातील ‘आता यापुढे आपली डोकी आपल्याच धडावर शाबूत ठेवा’ या आवाहनाची आठवण करून दिली होती. आता यापुढे ही आठवण करून देण्यासाठी जयंत पवार नसतील. मराठी समाजाबरोबर फक्त असेल तो त्यांचा विचार….!
Previous Articleविमानतळावर प्रथमच उतरले 189 सीटर बोईंग विमान
Next Article देशातील रुग्णवाढ चिंता वाढवणारी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.