- कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे आश्वासन
ऑनलाईन टीम / जळगाव :
जळगाव जिल्ह्यातील रावेरे येथे एका शेतातील रखवालदाराच्या चार मुलांची कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याकांडाने संपूर्ण जळगाव हादरले आहे. दरम्यान, हत्या झालेल्या भावंडांच्या कुटुंबीयांची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज भेट घेत सांत्वन केले.
यावेळी गृहमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना घरकुल जमीन आणि आर्थिक मदत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच राज्य शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांना दिला. सदर हत्याकांडातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत, असेही सांगितले.
पुढे ते म्हणाले, पीडित कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तसेच या प्रकरणाची जबाबदारी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांच्या कडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या प्रकरणात जलदगतीने कारवाई करण्याची सुचना स्थानिक पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.