आनंदी, आरोग्यमय जीवन व उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली ‘योग’ आहे असे म्हणणे आजच्या परिस्थितीत सयुक्तिक वाटते. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱया वेगामुळे 21 जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा ‘मोठा’ असतो. या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. दिवस मोठा तर रात्र लहान असते. सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत प्रकाश असतो. या दिवशी सूर्याचे तेज सर्वात जास्त प्रभावशाली असते व प्रकृतीची सकारात्मक ऊर्जा सक्रिय असते. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला. यावर्षी सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण साजरा करत आहोत.
या वषीची थीम आहे-‘योग के साथ रहे, घर पर रहे Be with yog-Be at home. जगभरातून स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित करण्याचे प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने केले जात आहेत. सन 2015 पासून सुरू झालेल्या या उपक्रमाने आता चळवळीचे रूप घेतले आहे. भारतीय धर्म-संस्कृतीमधील योग संकल्पनेची मांडणी ‘श्रीमद्भगवत गीता’ ग्रंथात केलेली आहे. प्राचीन काळापासून योगाच्या दोन परंपरा अस्तित्वात आहेत. एक साधनेची व दुसरी शास्त्राची. योगामधील आसन, प्राणायाम, मुद्रा, बंध, ध्यान इत्यादी विविध साधना गुरु-शिष्य परंपरेतून शिकल्या व शिकवल्या जातात ही साधनेची परंपरा. योगींनी आपल्या साधनेतील अनुभव ग्रंथ स्वरुपात व्यक्त केले आणि शास्त्र परंपरा प्रचलित झाली.
योगशास्त्राच्या परंपरेचे प्रवर्तक योगदर्शनाचे पतंजली ऋषी मानले जातात. दृश्यते अनेन इति दर्शनम् । पाहिले, जाणले जाते ते दर्शन. अगाध ज्ञान प्राप्त करून घेण्याचे एक साधन किंवा दृष्टिकोन आहे. पतंजली मुनींनी योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. आजच्या वैश्विक संकटात योगाचे महत्त्व संपूर्ण जगाने जाणले आहे. प्रत्येक आजाराचे मूळ कारण ‘रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे’ असे आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. ठोस असे कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने कोरोनापासून बचाव हेच कोरोनावरील मोठे औषध आपण अनुभवत आहोत. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट आली आणि आता तिसऱया लाटेचेही भाकित केले जात आहे. या सर्वांमध्ये ‘रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे’ हा एकमेव पर्याय डोळय़ासमोर आहे आणि त्यासाठी योग आत्मसात करणे आवश्यक वाटते.
योग शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, सामाजिक, कौटुंबिक, बौद्धिक, शैक्षणिक सर्व स्तरांवर स्वास्थ्य राखण्याचे काम करतो. आधुनिक युगात तणावमुक्त आरोग्यमय जीवन मनुष्याच्या दीर्घायुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मी रोज व्यायाम करतो, मी रोज आसन करतो, म्हणजे मी योग करतो असे नव्हे संपूर्ण अष्टांग योग अंगीकारणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे. अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान या गोष्टी अंतर्भूत आहेत. यातील प्रत्येक अंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यातही सामान्य जीवन जगताना अतिशय उपयोगी पडणारे अंग म्हणजे ‘यम आणि नियम’. यम म्हणजे सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह ही सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी उपयुक्त आहे. नियम म्हणजे शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान हे वैयक्तिक स्वास्थ्याची काळजी घेते. या पुढील पायरी म्हणजे आसन. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती ही पांढऱया पेशी, टी सेल यांच्या माध्यमातून होते व त्यांच्या निर्मिती केंद्रांचे कार्य सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आसन उपयुक्त ठरते. ‘नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन’च्या शोधनिबंधानुसार प्राणायामामुळे नक्कीच इम्यून सिस्टिम मजबूत होते. आपण नेहमीच वर वर श्वास घेतो. आपल्या फुफ्फुसांच्या क्षमतेपेक्षा खूप कमी भाग वापरतो. प्राणायामातील योग्यश्वसन क्रियेमुळे फुफ्फुसांची क्षमता व लवचिकता वाढते. रक्तातील ऑक्सिजन वाढल्याने इंद्रिये प्रगल्भ होतात. व्यायामाने सर्व अवयव, पेशी, मेंदूचे पोषण होत असते. भावनिक चढ-उतार, भीती, प्रतिकारक्षमता कमी करतात.
सध्या कोरोनाच्या काळामध्ये एकटेपणा, नैराश्य, उदासीनता, स्वमग्नता, अस्थिरता, नात्यांमधील कटुता असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. ताण वाढला की शरीरात कॉर्टीसोलची पातळी वाढली की रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यासाठी शांत झोप अत्यंत आवश्यक आहे. झोप म्हणजे शरीर रोगजनकांना मारण्यासाठी सक्रियपणे कार्य करत असते. शरीर पेशी विशेषतः मेंदूच्या पेशी दुरुस्त करण्याचे काम झोपेत होत असते. त्यामुळे निद्रा महत्त्वाची असते. इथे योगनिद्रादेखील अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. थोडक्मयात सध्याच्या धकाधकीच्या जीवनात चुकीच्या जीवनशैलीमुळे, आभासी दुनियेत जगताना शारीरिक, मानसिक, बौद्धिक, कौटुंबिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक स्वास्थ्य टिकवून ठेवणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. त्यासाठी सर्वार्थाने योग हा महत्त्वाचा ठरत आहे आणि म्हणूनच ‘जागतिक योग दिन’ निमित्त ठरून त्यायोगे योगाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोचवणे, प्रोत्साहन देणे, प्रेरणा देणे यासाठी जगभर प्रयत्न चालू आहेत. या काळात अनेक संस्थांनी महिनाभर ऑनलाइन योगाभ्यासाचे धडे अनेकांना दिले. यातून मोठी आरोग्यक्रांती घडून येणार आहे यात शंका नाही. या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम एक दिवसाचा, एक महिन्याचा न राहता निरंतर चालू ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने हितकर आहे. अनेक देशात योगाला शृंगार मानले जाते. योगजीवन सकारात्मक व ऊर्जावान बनवून ठेवण्यामध्ये मदत करते. रोगविरहित शरीरापेक्षाही आनंद, प्रेम, उत्साह, नवचेतना, दातृत्व, ध्येयाप्रती तळमळ हे सर्व जेव्हा उत्स्फूर्तपणे तुमच्यात व्यक्त होत असेल, तेव्हाच खरी आरोग्यसंपन्नता लाभेल. योग तुमच्या जाठराग्नीला धात्वाग्नीला प्राकृत ठेवून आरोग्य उत्तम ठेवते, वजनात घट होते. आहाराबाबत सजगता येते. सुखाच्या शोधात सैरभैर धावताना आंतरिक शांती अनुभवण्याची संधी योग देते. ताणतणावापासून मुक्ती मिळते, मन नेहमी प्रसन्न राहते. षड्रिपुपासून दूर राहण्यास मदत मिळते. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शरीर, मन, आत्मा या तिघांची मिळून एकसंध अशी कार्यप्रणाली चालते. योगासनामुळे शरीर बळकट बनते. प्राणायामामुळे श्वसन प्रणाली स्वस्थ राहते. ध्यानामुळे मनावरील मळभ दूर होते. सैरभैर मनावर अंकुश आणून अंतर्मनात डोकावण्याची प्रक्रिया सुरू होते, भूत आणि भविष्यात धावणाऱया चंचल मनावर अंकुश ठेवून वर्तमानात रमण्यासाठी आनंदी राहण्यासाठी व एकाग्र होण्यासाठी मदत करते. शरीराचा बांधा सुडौल, लवचिक, सशक्त बनवते. त्यामुळे आत्मविश्वास, उत्साह वाढतो, कार्यशक्ती वृद्धिंगत होते. त्याबरोबरच संवेदनशीलता, सकारात्मक विचारसरणी वाढल्याने नातेसंबंध सुदृढ होण्यासाठी मदत होते, निर्णयक्षमताही वाढते. अनेक ग्रंथींचे कार्य प्राकृत होऊन चांगले अंतस्त्राव स्त्रवते. त्याचा उपयोग सूक्ष्मातिसूक्ष्म शारीरिक-मानसिक घडामोडींमध्ये आरोग्याच्या दृष्टीने दिसून येतो. विचारसरणी विस्तृत, स्वच्छ, स्पष्ट होते, बुद्धिमत्ता तीक्ष्ण होते, वैचारिक प्रगल्भता येते. राग, दुःख, उदासिनता यावर मात करून आनंद, उत्साह, प्रसन्नता, संकटावर मात करण्याची शक्ती प्राप्त होते. अनेक दुर्धर आजारातून मुक्त होऊन आरोग्यमय जीवन योग देते. आज दृढनिश्चय करूया की निरंतर योगाभ्यासने मी स्वस्थ राहीन व त्यायोगे माझे कुटुंब, समाज, गाव, नगर, देश आणि विश्व स्वस्थ राहील. याद्वारा उज्ज्वल भारताच्या निर्मितीसाठी खारीचा वाटा उचलण्याचा ‘योग’ प्रत्येकाच्या वाटय़ाला येईल. अन् या शुभयोगातून सर्वत्र ‘शुभम् भवतू-शुभम् भवतू’ होईल!
डॉ. वैशाली लोढा