नगराध्यक्षांसह चौघांना अद्याप अटक नाही : तपासानंतर होणार कारवाई – पोलीस
कणकवली:
‘लॉकडाऊन’ असतानाही रस्त्यावर फिरत असताना विचारणा केल्यावर जावेद शेख याने पोलिसांशी हमरीतुमरी केल्याने तसेच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर थेट पोलीस स्टेशन गाठत, तेथे पोलिसांशी हुज्जत घातल्याबाबत गुन्हा दाखल असलेल्या शेखसह कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अबिद नाईक, संदीप नलावडे यांना रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत अटक झाली नव्हती. घटनेबाबत तपास सुरू असून त्यानंतर कारवाई होणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी दिली.
16 एप्रिलला घडलेल्या या घटनेबाबत पोलीस नाईक आशिष जामदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जामदार हे येथील पटकीदेवी मंदिरनजीक डय़ुटीवर होते. सकाळी 10 च्या सुमारास जावेद शेख हा या रस्त्यावरून वारंवार ये-जा करत होता. जामदार यांनी त्याला ‘जिल्हय़ात संचारबंदी सुरू आहे. तू वारंवार फिरू नकोस’ असे सांगितले. त्यावर जावेद याने ‘तू मला कायदा शिकवू नको. तू मला ओळखत नाहीस’ असे प्रत्युत्तर दिले. पुढे तो तेथून निघून गेला.
मात्र, सायंकाळी 6.30 वाजता तो पुन्हा तेथे आला. ‘तुम्ही मला फिरू नको, असे सांगितले. मग या गाडय़ा येथून कशा गेल्या? त्यांना नियम वेगळे आहेत का?’ असे विचारून तो जामदार यांच्याशी वाद घालू लागला. जामदार यांनी त्याला ‘तुझी काय तक्रार असेल, तर तू पोलीस निरीक्षक कोळी यांना सांग. येथून निघून जा’ असे सांगितले. तेथे असणारे लोकही जावेद याला ‘पोलिसांसोबत भांडू नको’ असे सांगत होते. परंतु तो ऐकत नव्हता. त्यावेळी जामदार यांनी चौकात डय़ुटीवर असलेले पोलीस नाईक योगेश सातवसे यांना फोन करून माहिती देत पेट्रोलिंगची गाडी पाठवायला सांगितले. त्यानंतरही जावेद हा वाद घालत असल्याने जामदार यांनी त्याला ‘आमचे वरिष्ठ येथे येत आहेत. तू त्यांच्याशी बोल’ असे सांगितले असता, जावेदने जामदार यांची कॉलर पकडली. तसेच ‘मला काय झाले, तर तुला बघून घेईन’ अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पुढे तेथे आलेल्या सहाय्यक निरीक्षक सागर खंडागळे व अन्य पोलिसांनी जावेद याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, तो प्रतिकार करत भांडू लागला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अबिद नाईक, संदीप नलावडे व अन्य आले. नलावडे याने जामदार यांना ‘तुझी हिंमत कशी झाली, माझ्या माणसाला हात लावायची? हिंमत असेल, तर वर्दी उतर आणि चौकात ये. बघतो तुला’ अशी धमकी दिली. अबिद नाईक याने ‘कोण तू, तुझी हिंमत कशी होते?’ असे म्हणत जामदार यांच्या अंगावर यायला लागला. तर संदीप नलावडे हा ‘याला आत्ताच ठोकूया. काय करणार पोलीस?’ असे म्हणत जामदार यांच्या दिशेने येऊ लागला, असे जामदार यांनी फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार वरील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.