विकास करण्याकडे मनपाचे दुर्लक्ष : रस्त्यावर वाहनांचेही वेडेवाकडे पद्धतीने पार्किंगमुळे वाहतूक कोंडी : कचऱयाचे ढिगारे
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील रस्त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱयांकडे तक्रारी करण्यात येतात. पण जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून याकडेच जिल्हाधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले असताना शहरात अन्य रस्त्यांच्या समस्यांचे निवारण कसे करणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. अशातच याठिकाणी बहुतांश वाहनधारक वेडीवाकडी वाहने पार्क करीत असून काही ठिकाणी तर चक्क रस्त्यावरच वाहने पार्क करण्यात येत आहेत. यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आणि महापालिकेच्यावतीने नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्याची दुरुस्ती, डांबरीकरण तसेच स्वच्छता करण्यात येते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील समस्येकडे महापालिकेने कानाडोळा केला आहे. यामुळे अनेक ठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचून रस्त्याची दुरवस्था झाली असून वाहनधारकांची गैरसोय होत आहे. प्रादेशिक आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विविध न्यायालये, जि. पं. कार्यालय, ता. पं. कार्यालय, ट्रेझरी कार्यालय, नोंदणी कार्यालय, भू मापन कार्यालय, समाज कल्याण कार्यालय अशी विविध कार्यालये जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आहेत. जिल्हा पंचायत व माहिती व प्रसिद्धी खात्याच्या कार्यालयाकडे जाण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयामागील बाजूने जाणाऱया रस्त्याचा वापर केला जातो. रस्त्याची दुरवस्था झाली असून जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्याच्या समस्येची जाणीव जिल्हा प्रशासनाला नाही. यामुळे जिल्हाधिकाऱयांनी कार्यालयाबाहेर फिरकून रस्त्याची पाहणी करावी, अशी मागणी होत आहे. कार्यालय आवारातील रस्त्याचा विकास करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने जिल्हय़ातील रस्त्यांचा विकास कसा करणार? असा मुद्दा नागरिक करीत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध कार्यालयात येणारे नागरिक चव्हाट गल्ली, कचेरी रोड, अशा दोन रस्त्यांचा वापर होतो. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्ते अपुरे पडत आहेत. यामुळे या रस्त्यावर वाहनधारकांची गर्दी वाढली आहे. मात्र रस्त्याच्या डांबरीकरणाकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. आवारातील रस्त्याचा विकास करण्याकडे दुर्लक्ष केल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या बाजूने गटारी आहेत, पण कचरा साचल्याने पावसाळय़ात रस्त्यावरून पाणी वाहते.
चव्हाट गल्ली कॉर्नरवर वाहतूक कोंडी
पार्किंग समस्या निवारण करण्याकडे जिल्हा प्रशासन आणि वाहतूक रहदारी खात्याने साफ दुर्लक्ष केले आहे. यामुळे या रस्त्यावर वेडीवाकडी वाहने पार्क करण्याचा प्रकार वाढला आहे. वाहनधारक हव्या त्या ठिकाणी वाहने पार्क करून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहेत. जुने जि. पं. कार्यालय ते चव्हाट गल्लीला जाणाऱया रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अशातच वाहनधारक रस्त्यावर वाहने पार्क करून रस्ताच बंद करीत आहेत. विशेषतः झेरॉक्स काढण्यासाठी तसेच स्टॅम्पपेपर खरेदीसाठी येणारे वाहनधारक कोणताच विचार न करता रस्त्यावर वाहने पार्क करून निघून जात असतात. यामुळे अन्य वाहनधारकांना ये-जा करण्यास अडचण निर्माण होत असून वाहतूक कोंडी होत आहे. चव्हाट गल्लीच्या कॉर्नरवर नेहमी वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांना बराच वेळ ताटकळत थांबावे लागते. या ठिकाणी पार्किंगसाठी मुबलक जागा असूनही वाहनधारकांच्या निष्काळजीपणामुळे अन्य वाहनधारक आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. याकडे रहदारी पोलीस खात्याचेही साफ दुर्लक्ष झाले असून जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.