प्रतिनिधी/रत्नागिरी
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांची लवकरच बदली करण्यात यावी म्हणून जिल्हाधिकाऱयांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. काही आठवडय़ांपूर्वीच हा प्रस्ताव पाठवण्यात आला असून अनेक कामांच्या बाबतीत दिरंगाई आणि काही तक्रारी असल्याने हा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर या रत्नागिरीत 2 वर्षापूर्वी रूजू झाल्या. कोरोना काळात अपेक्षित असल्याप्रमाणे त्यांनी काम केले नाही. अनेक कामांमध्ये दिरंगाई केली. लसीकरणाचे नियोजन, ट्रेसिंग रेट यामध्ये आवश्यक नियोजनाचा अभाव, वाढते कोरोना रूग्ण या सगळय़ा बाबींचा विचार करता जिल्हा आरोग्य अधिकाऱयांची कामगिरी समाधानकारक नसल्याने त्यांचा बदलीचा प्रस्ताव देण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या कोरोना काळात प्रभावीपणे काम करणाऱया अधिकाऱयांची गरज असल्याचेही जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले. बदलीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून 2 आठवडे उलटून गेले असून यावर शासन काय निर्णय घेणार, याकडे आरोग्य विभागाचेही लक्ष लागून राहिले आहे.
प्रशासनाची अप्रत्यक्ष कबुली
जिल्हा आरोग्य अधिकाऱयांच्या बदलीचा प्रस्ताव पाठवताना कोराना प्रतिबंधाच्या कामामध्ये दिरंगाईचे कारण देण्यात आले आहे. या द्वारे प्रशासनाने जिह्यात कोरोना विरोधातील लढाईत ढिलेपणा व दिरंगाई झाल्याची तसेच यंत्रणा अपयशी ठरल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिल्याचे मत व्यक्त होत आहे. मुळात या आपत्तीविरोधातील लढय़ाची प्रमुख सूत्रे कोणाच्या हातात होती व अपयशाचे खापर फक्त एकाच अधिकाऱयाच्या डोक्यावर फोडणे हा योग्य निर्णय आहे का, या बाबतही उलटसुलट चर्चा सुरु आहेत.