प्रतिनिधी/ रत्नागिरी
हवामान विभागाने रत्नागिरी जिह्यात 200 मिमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केलेला असून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यासाठी नौदल, तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसेच स्थानिक प्रशासनाला सज्ज राहण्यास सांगितले आहे. मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेल्या संततधारेचे दिवसभर मुसळधार पावसात रुपांतर होऊन चांगलेच झोडपून काढले. बुधवारी अशीच स्थिती कायम राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिह्यात मंगळवारी पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे. रत्नागिरी जिह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती बुधवारी देखील राहणार असून काही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात जिह्यात 200 मिमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात जिह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होताना दिसत आहे.
रत्नागिरी जिह्यात पावसाने आजपर्यंत सरासरी 1500 मिलिमिटरचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या चोविस तासात रत्नागिरी जिह्यात एकूण 272 मिमि इतक्या 30.22 सरासरी पर्जन्यमानाची नोंद झाली. मात्र यादिवशी सकाळी 10 वाजल्यापासून पावसाने चांगलाच जोर धरला होता. दिवसभर धो-धो पाऊस कोसळत होता. त्यामुळे सखल भागात पाणी साचणे, नदय़ा-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. असाच पावसाचा वेग कायम राहिल्यास पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनस्तरावरून करण्यात आल्या आहेत.