बाळासाहेब उबाळे/कोल्हापूर :
कार्यालयात अधिकारी चार पण खुर्च्या दोनच.पण दोघांनाही ऐसपैस बसता येत नाही अशी जागा.ही अवस्था आहे कोल्हापूर जिल्हय़ाच्या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱया हवामान विभागाच्या कार्यालयाची.1945 साली स्थापन झालेले हे कार्यालय आजही अडगळीतच आहे.प्रशस्त कार्यालयाची अनेकवेळा मागणी करुनही आजपर्यंत या कार्यालयाला स्वतःची जागा मिळाली नाही.यामुळे कार्यालयासाठी कोणी जागा देता का जागा अशी म्हणण्याची वेळ येथील अधिकाऱयांवर आली आहे.
भारतात हवामानाचा अंदाज वर्तवण्याची पध्दत ब्रिटिश कालावधीत सुरु झाली.145 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी सिमला येथे हवामान विभागाच्या कार्यालयाची स्थापना केली.यानंतर काही वर्षानी कोलकत्यात हे कार्यालय स्थलांतर करण्यात आले.त्यानंतर दिल्लीत हे कार्यालयात हलवण्यात आले असून सद्या दिल्लीत हवामान विभागाचे मुख्यालय आहे.तर मुंबई,कोलकत्ता,चेन्नई,गुवाहाटी,नागपूर ही विभागीय कार्यालये आहेत.कोल्हापूर जिल्हा हवामान विभागाचे कार्यालय जुना पुणे- बेंगलोर रोडवरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या एका खोलीत आहे. या कार्यालयाची स्थापना 1945-46 या वर्षातील आहे. या कार्यालयातून जिल्हय़ातील हवामानाची दिवसातील चार निरीक्षणे नोंदवून ती मुंबई विभागीय कार्यालयाला पाठवली जातात. हवेचा दाब, आर्द्रता,वाऱयाची दिशा,वेग,आकाशातील ढगांच्या प्रकाराची नोंद केली जाते. जागतिक प्रमाण वेळेनुसार (ग्रिनिच मीन टाईम) सकाळी 8ः30 वाजता दिवसातील किमान आणि सायंकाळी 5ः30 वाजता कमाल तापमानाची नोंद करुन त्याचा अहवाल वेधशाळेकडे पाठवण्यात येतो.यानंतर मुंबई कार्यालयात छाननी आणि पृथःकरण होऊन हवामानाचा अंदाज वर्तवला जातो.
कोल्हापूरातील हवामान विभागाचे काम मोठे असले तरी कार्यालय मात्र खुराडय़ाएवढय़ा सात बाय सहाच्या खोलीत सुरु आहे. जिन्याच्या खाली एका खोलीत दोन खुर्च्या, दोन टेबल,एक संगणक आणि भिंतीला लटकवलेले तापमान नोंद करण्याचे यंत्र आहे.या विभागात चार अधिकारी असले तरी दिवसभरात कामकाज मात्र एकानेच करायचे अशी येथील अवस्था आहे. दोन व्यक्तीं व्यवस्थित बसू शकत नाहीत इतकी अडगळ या कार्यालयात आहे.यामुळे बाहेरील तिसरी व्यक्ती कामानिमित्त गेल्यास अधिकाऱयांना चर्चा करण्यासाठी कार्यालयाच्या बाहेर येण्याची वेळ येते.कार्यालयात बसा असे म्हणण्याची सुध्दा अधिकाऱयांची अडचण आहे. यामुळे कार्यालयासाठी कोणी जागा देता का जागा असे म्हणण्याची वेळ येथील अधिकाऱयांवर आली आहे.
प्रशासकीय पातळीवर उदासीनता–
हवामान विभागाच्या येथील अधिकाऱयांनी 2007-08 साली प्रशासकीय पातळीवर प्रशस्त कार्यालयाची मागणी केली होती.त्यावेळी करवीर तहसीलदार कार्यालयाकडून मार्केट यार्ड जवळील जोतिबा हॉटेलजवळ एक जागा सुचवली होती.पण त्या जागेवर अतिक्रमण असल्याने जागेचा प्रस्ताव मागे पडला. आता पुन्हा नव्याने पाठपुरावा सुरु आहे.
विमानतळावर कार्यालयासाठी चाचपणी–
हवामान विभागाच्या कार्यालयात के.जी.कानडे हे प्रमुख आहेत.आर.एच.घाटगे,राकेश शर्मा आणि अमरचंद मीना हे असिस्टंट सायंटिस्ट आहेत.या चारपैकी दोन अधिकारी दिवसभर विमानतळावर असतात.सद्या विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. नवीन टर्मिनल इमारत झाल्यास त्याठिकाणी हवामान विभागाच्या कार्यालयाला जागा मिळावी असा प्रस्ताव आहे.पण अद्याप ठोस आश्वासन विमानतळ प्राधिकरणाकडून मिळाले नाही.
कोल्हापूर कार्यालयाचा बेस्ट मेटरॉलॉजिकल ऍवार्डने सन्मान
हवामान विभागातील उत्कृष्ट कार्यालयाबद्दल दिल्लीच्या मुख्यालयाकडून दरवर्षी देशातील तीन कार्यालयांना सन्मानित करण्यात येते.2019-20 या वर्षातील अतिवृष्टीच्या काळात कोल्हापूर कार्यालयाने केलेल्या कामाची दखल घेत कोल्हापूरच्या कार्यालयाला बेस्ट मेटरॉलॉजिकल ऍर्वाडने सन्मानित करण्यात आले.तर आसाम आणि हैदराबादमधील रामगुंडम या दोन कार्यालयांचा यामध्ये समावेश आहे. हवामान विभागाचे महानिदेशक मृत्यूंजय महापात्रा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून त्यांना सन्मानित करण्यात आले.कोल्हापूरातून आर.एच.घाटगे यांनी प्रशस्तीपत्र स्वीकारले.