सावधानता बाळगण्याचे जिल्हाधिकाऱयांकडून आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. बेळगाव जिल्हय़ातही दि. 20 ते 25 नोव्हेंबरपर्यंत अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नदीकाठी राहणाऱयांनी गांभीर्याने दखल घेऊन सुरक्षितस्थळी रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बेळगाव जिल्हय़ामध्ये अचानकपणे पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी होत आहे. हा पाऊस आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. हवामान खात्याने 25 नोव्हेंबरपर्यंत अतिवृष्टी होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे धोकादायक घरांतून नागरिकांनी इतरत्र स्थलांतरित व्हावे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत, ज्या भागाला पुराचा अधिक धोका आहे त्या परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.