प्रतिनिधी/ रत्नागिरी
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाची गतवर्षी झालेली दुर्घटना लक्षात घेत यावर्षी खबरदारी म्हणून रत्नागिरी पाटबंधारे विभागाकडून जिल्हय़ातील सर्व धरणांवर पहारेकरी, चौकीदार यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सर्व धरणांची पावसाळापूर्व पाहणी पूर्ण झाली असून सर्व धरणे सुरक्षित असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. मात्र या धरणांकडे पर्यटकांना जाण्यास मज्जाव असल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले आहे.
गतवर्षी तिवरे धरणफुटीची दुर्घटना घडली. अशा प्रकारची घटना यापुढे कधीही होऊ नये म्हणून रत्नागिरी सिंचन भवन येथील पाटबंधारे विभागाने आवश्यक ती काळजी व उपाययोजना हाती घेतल्या. सिंचन भवन कुवारबाव येथे पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाच्या माध्यमातून धरणातील पाणी साठा, सद्यस्थिती, पवसाचे प्रमाण याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे माहीती दिली जाते. सर्व धरणांची पावसाळापूर्व पाहणी झालेली आहे. या पाहणीतून सर्व धरणे सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले आहे.
जिल्हयात काजळी नदी, जगबुडी नदी, मूचकुंदी नदी, अर्जुना नदी, शास्त्राr नदी, वाशीष्ठी या मोठय़ा नद्यांचा समावेश आहे. जलसंपदा विभागामार्फत या नद्यांचे रेड लाईन व ब्ल्यू लाईन सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. त्याचे रेखाचीत्र जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर सर्वांसाठी अपलोड करण्यात आलेले आहे.
मागिल वर्षी 2 जुलै नंतर धरण सुरक्षितता संघटना, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या चेकलिस्टनुसार सर्व धरणांची तपासणी करुन अहवाल शासनास सादर करण्यात आला होता. त्या अहवालानुसार काही धरणांच्या किरकोळ दुरुस्ती आवश्यक होत्या. त्या कामांना मंजुरी देण्यात आली. यानुसार निवे, ता.संगमेश्वर व मोरवणे, ता.चिपळूण या धरण प्रकल्पांच्या दुरुस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित बारा धरणांच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. यावर्षी लॉकडाऊनमुळे धरणांच्या दुरुस्त्या पुर्ण होऊ शकल्या नाहित. मात्र अत्यावश्यक दुरुस्त्या करण्यात आल्याचे या विभागाच्या सूत्रांकडून सांगितले जात आहे.
जिल्हय़ातील नद्या अजूनही धोक्याच्या पातळीखालीः
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्य़ात मुसळधार पर्जन्यमान होत आहे. यामुळे नद्यांच्या पातळीत काही ठिकाणी वाढ झालेली आहे. मात्र सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये जगबुडी नदी (खेड) ची धोका पातळी 7 मीटर व इशारा पातळी 6 मीटर इतकी असून सध्या ही नदी 3.75 मी. पातळीवरून वाहत आहे. वाशिष्ठी (चिपळूण) नदीची धोका पातळी 7 मी. तर इशारा पातळी 5 मी. असून सध्याची पूर पातळी 3.55 मी. इतकी आहे. काजळी नदी (लांजा) धोका पातळी 18 मी. व इशारा पातळी 16.50 मी. आहे,तिची सध्याची 13.90 मी. इतकी पूर पातळी आहे. कोदवली नदी (राजापूर)ची धोका पातळी 9.13 मी. तर इशारा पातळी 4.90 मी. असून पूर पातळी 4.50 मी. इतकी आहे. शास्त्री (संगमेश्वर)ची धोका पातळी 7.80 मी. तर इशारा पातळी 6.20 मी. असून पूर पातळी 5.20 मी. आहे. सोनवी नदी (संगमेश्वर)ची धोका पातळी 8.60 तर इशारा पातळी 7.20 मी. असून सध्या पूर पातळी 5.10 इतकी आहे. मुचकुंदी नदी (लांजा) धोका पातळी 4.50 मी. तर इशारा पातळी 3.50 मी. असून आजची पूर पातळी 1.10 इतकी आहे. बावनदी (संगमेश्वर) ची धोका पातळी 11 मी. तर इशारा पातळी 9.40 मी असून आजची पूर पातळी 6 मी. इतकी नोंदविण्यात आली आहे.