भाजपचा आरोप : जिल्हा रुग्णालयासमोर छेडले लक्षवेध आंदोलन : मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांविरोधात घोषणा
- आठ दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
प्रतिनिधी / ओरोस:
जिल्हय़ावर कोरोनामुळे वाईट स्थिती ओढवली असून याला पालकमंत्री अणि उद्धव ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत जिल्हा भाजपने शुक्रवारी जिल्हा रुग्णालयासमोर सरकारविरोधी घोषणाबाजी करीत लक्षवेध आंदोलन केले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत व मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सिंधुदुर्गच्या ढासळलेल्या आरोग्य स्थितीकडे गांभिर्याने लक्ष द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
सद्यस्थितीत जिल्हा रेडझोनमध्ये आहे. मागील नऊ दिवसांत 120 आणि आतापर्यंत 800 च्यावर मृत्यू कोरोनाने झाले आहेत. योग्य पद्धतीच्या आरोग्य सुविधा उभारण्याकडे पालकमंत्री आणि ठाकरे सरकार यांच्या झालेल्या दुर्लक्षामुळे जिल्हय़ातील जनता त्रस्त झाली आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच जि. प. परिसरात दाखल झाले होते. त्यानंतर जि. प. अध्यक्ष संजना सावंत, जिल्हा भाजप अध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर करीत जिल्हा रुग्णालय गाठले.
आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर
जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध करण्यात आला. जिल्हय़ात तज्ञ डॉक्टर नाहीत, फिजिशियन नाहीत, औषध पुरवठा योग्य नाही, अंत्यविधी प्रक्रियेत घोटाळा होत आहे, कोरोना बळींचा आकडा वाढत आहे, असे आरोप करीत आरोग्य यंत्रणाच व्हेन्टिलेटरवर गेल्याचा आरोप तेली यांनी केला. प्रमुख रुग्णालयांमधून अद्ययावत सुविधा नाहीत. कर्मचाऱयांचे पगार वेळेवर नाहीत, आदी तक्रारींचा पाढा वाचत याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
भाजपला आंदोलनाची हौस नाही!
तेली म्हणाले, कोरोना काळात आंदोलन करण्याची भाजपला हौस नाही. मात्र जनतेशी दायित्व असल्याने भाजप आता मागे हटणार नाही. मागील सव्वा वर्ष भाजपने शासनाला सहकार्य केले. मात्र शासनकर्ते कोरोनाबाबतच्या सुविधा देण्यात कमी पडले आहेत, असा आरोप त्यांनी केला. नारायण राणे, सुरेश प्रभू, रवींद्र चव्हाण या भाजप नेत्यांना एकदाही विश्वासात घेतले गेले नाही. प्रशासन आपल्या परीने काम करीत आहे. मात्र आरोग्य सुविधांच्या आणि मनुष्यबळाअभावी या रोगाचा प्रसार वाढत असून मृत्यूचे प्रमाणही भयावह आहे. मृत्यूचे कारण दाखवताना अन्य आजारांचा उल्लेख केला जात आहे. या पलिकडे आणखी किती मृत्यू झाले असतील, ते माहीत नाही, असे सांगत आरोग्य यंत्रणेच्या माहिती देण्याच्या कार्यपद्धतीबाबत त्यांनी संशय व्यक्त केला.
श्रेयवादापेक्षा जनतेची काळजी घ्या!
पीएम केअरमधून कणकवली आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांना प्रत्येकी दहा व्हेन्टिलेटर देण्यात आले. मात्र अनेक महिने ते वापराविना पडून आहेत. मायनिंगचा निधी हा जिल्हावासीयांचा अधिकार आहे. यातून खरेदी करण्यात आलेल्या रुग्णवाहिकांबाबत श्रेयवादाचे राजकारण करण्यापेक्षा मृत्यूच्या दाढेत जाणाऱया जनतेची काळजी करा, असा सल्लाही तेली यांनी दिला. जिल्हय़ाची आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचे पालकमंत्री सांगत आहेत. मग शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांना जिल्हय़ाबाहेरील खासगी रुग्णालयात उपचार का घ्यावे लागले, असा सवालही तेली यांनी उपस्थित केला.
ही तर आंदोलनाची सुरुवात..!
टास्क फोर्स पाठवून मृत्यूची नेमकी कारणे समोर आणवीत. फिजिशियनची व्यवस्था करावी. रिक्त पदे तातडीने भरावीत. विद्युत दाहिन्या उभाराव्यात, आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. आंदोलनाची ही तर केवळ सुरुवात आहे. सोमवारपासून प्रत्येक तालुक्यात आंदोलन केले जाणार आहे. प्रसंगी याची व्याप्ती गावस्तरापर्यंत वाढविली जाईल आणि येत्या आठ दिवसात योग्य बदल न झाल्यास पुढील दिशा जाहीर केली जाईल. जनतेला न्याय मिळेपर्यंत ते सुरू राहील, असे तेली यांनी स्पष्ट केले. रेल्वे स्थानके, बसस्थानके, कोविड सेंटर इत्यादी ठिकाणी जि. प. ची यंत्रणाच काम करीत आहे. असे असताना जि. प. ने काहीच केले नाही, म्हणणे योग्य नाही, असेही तेली म्हणाले.
या आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष राजू राऊळ, जि. प. अध्यक्ष संजना सावंत, रणजित देसाई, प्रभाकर सावंत, भाई सावंत, दादा साईल, श्वेता कोरगावकर, शर्वाणी गावकर, महेन्द्र चव्हाण, अंकुश जाधव, बाबा आंगणे, आनंद शिरवलकर, बंडय़ा सावंत, जेरॉन फर्नांडिस, पांडुरंग मालवणकर, अशोक सावंत, साक्षी सावंत, संध्या तेर्से, रेखा काणेकर, राकेश कांदे, विनायक राणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलकांवर गुन्हा दाखल
दरम्यान आंदोलकांना रोखण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता चौकात आंदोलन करणाऱया जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह 34 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली. जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या कलम 144 अंतर्गतच्या जमावबंदी आदेशाचा भंग करून बेकायदेशीर जमाव करीत घोषणाबाजी केल्याप्रकरणी संबंधितांवर भा. दं. वि. कलम 188, 143, 269, 270 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.