नारायण राणेंचा आरोप : ‘निधीला कात्री लावल्याने जिल्हय़ाचा विकास होणार ठप्प’
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्गात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना ती रोखण्यासाटी आणि रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कमी पडत आहे. जिल्हा विकास निधीला शासनाने मोठी कात्री लावल्याने फक्त 44 कोटीच जिल्हय़ाला मिळणार आहेत. त्यामुळे जिल्हय़ाचा विकास होणार नाही. चांदा ते बांदा योजनेचेही 92 कोटी परत गेले आहेत. शासन व प्रशासनाचा हा नाकर्तेपणा आहे, असा आरोप खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केला.
खासदार राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन कोरोना व जिल्हा विकास निधीसंदर्भात माहिती घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी आमदार नीतेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, जि. प. अध्यक्षा समिधा नाईक, अतुल काळसेकर, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जि. प. विषय समिती सभापती रवींद्र जठार, सावी लोके, माधुरी बांदेकर, शारदा कांबळी, विनायक राणे आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात आजपर्यंत कोरोना बाधित 105 रुग्ण आढळले. त्यातील 98 टक्के रुग्ण हे मुंबईहून आलेले आहेत. रुग्णांची संख्या अजूनही वाढू शकते. परंतु, प्रशासकीय यंत्रणा कोरोना रोखण्यास आणि बाधित रुग्णांवर उपचार करण्यास कमी पडत आहे. आवश्यक साधनसामुग्रीही उपलब्ध नाही, अशी परिस्थिती आहे. जिल्हाधिकाऱयांनी उपाययोजनांची माहिती दिली. परंतु शासनाकडून निधीच मिळत नाही. निधी दिला जात नसेल, तर कोरोना रोखण्याचे काम जलदगतीने होणार कसे? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
33 टक्केच विकास निधी मिळणार
जिल्हय़ाला 150 कोटीपर्यंत विकास निधी मिळत होता. परंतु, शासनाने यावर्षी विकास निधीला कात्री लावली आहे. 2020-21 साठी 144 कोटी मंजूर होते. परंतु, शासनाने 33 टक्केच निधी देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे यावर्षी फक्त 44 कोटीच निधी मिळणार आहे. त्यापैकी 14 कोटी प्राप्त झाले आहेत. परंतु एवढय़ा कमी निधीमध्ये जिल्हय़ाचा विकास होणार नाही, दुरुस्तीचीही कामे होणार नाहीत. कोरोना संकट काळात अधिक निधी देणे आवश्यक होते. कोरोना बाधित रुग्णांवर योग्य उपचार होत नाहीत. रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांच्या नातेवाईकांकडून तक्रारीही आल्या आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.
सरपंच मदत करताहेत, पण निधी नाही
ग्राम समित्यांच्या माध्यमातून कोरोनासंदर्भात सर्व त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सरपंचांवर जबाबदारी सोपविली आहे. ते चांगले कामही करीत आहेत. पण त्यांना निधी दिलेला नाही. जिल्हा रुग्णालयामध्ये एका व्यक्तीचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आधी आला आणि एका तासात निगेटिव्ह आला. हा सगळा गोंधळ असून या संदर्भात अधिवेशनामध्ये आवाज उठवला जाणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
चक्रीवादळाच्या नुकसानीचे पंचनामे करा
चक्रीवादळाच्या तडाख्याने सिंधुदुर्ग जिल्हय़ात मोठे नुकसान झाले आहे. अनेक फळझाडे पडली, घरे कोसळली. आधीच कोरोनाचे संकट, त्यात वादळाचे संकट. त्यामुळे तातडीने चक्रीवादळातील नुकसानीचे पंचनामे करावेत व लोकांना मदत द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आल्याची माहिती खासदार राणे यांनी दिली.