शुक्रवारी दिवसभर झोडपले
प्रतिनिधी/ रत्नागिरी
आठवडाभरापासून सुरू झालेल्या संततधार पावसाचा जोर शुक्रवारीही कायम होता. जिल्हाभर मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. संगमेश्वर बाजारपेठेत पुराचे पाणी घुसण्याची शक्यता असून राजापूर, खेडमध्येही धोका कायम आहे.
जिह्यात सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी चांगलेच झोडपून काढले. सोसाटय़ाच्या वाऱयासह कोसळणाऱया पावसाने येथील नदय़ांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून धरणेही भरली आहेत. शुक्रवारी सकाळपर्यंत झालेल्या 24 तासांत जिल्हय़ात सरासरी 27.19 मिमी पावसाची नोंद झाली. त्यावेळी एकूण 244.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 21.80, दापोली 29.40 मिमी, खेड 15.60 मिमी, गुहागर 48.30 मिमी, चिपळूण 14.20 मिमी, संगमेश्वर 23.80 मिमी, रत्नागिरी 34.00 मिमी, राजापूर 35.70 मिमी, लांजा 21.90 पावसाची नोंद झाली आहे. या पावसाचा जोर आगामी काही तासांत कायम राहणार असल्याचा हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या सकाळी 10 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार जिह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती खालीलप्रमाणे आहे. दापोली तालुक्यात मौजे लोडवाडी येथील सुधाकर पांडुरंग रहाटवाळ यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 1 लाख 61 हजार 400 रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच मौजे लोडवाडी येथील श्रीकांत रामचंद्र मिसाळ यांच्या घराचे पावसामुळे अंशत:1 लाख 66 हजार 50 रुपयांचे नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील मौजे वांद्री येथील जय भार्गव बने यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 1 हजार 280 रुपयाचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे कुठेही जिवीत हानी झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. पावसाचा वाढलेला जोर लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनस्तरावरून करण्यात आलेले आहे.