बाजारपेठांना दोन तासांची मुदतवाढ : लॉजचा 67 टक्के भाग क्वारंटाईनसाठी : गणेशोत्सवात प्रवेशबंदी विचाराधीन
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात आठ दिवसांसाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन शिथील करण्यात आले आहे. 9 जुलैपासून सर्व दुकाने, बाजारपेठा, कार्यालये पूर्ववत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच बाजारपेठा सुरु ठेवण्यास आणखी दोन तास वाढवून देण्यात आले आहेत. बाजारपेठा आता सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तर गणेशोत्सव काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याचीही तयारी सुरू आहे. गणेशोत्सव काळात जिल्हा प्रवेश बंदी घालणे विचाराधीन असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी येथे दिली.
जिल्हय़ात जून महिन्याच्या मध्यानंतर कोरोना बाधित रुग्णसंख्या अचानक वाढली होती. कणकवली व कुडाळ तालुक्यात मोठय़ा संख्येने रुग्ण आढळले होते. त्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱयांनी जिल्हय़ात 2 ते 8 जुलै या कालावधीत लॉकडाऊन केले होते. या काळात कोरोनाचा वेग मंदावण्यात यश आले. त्यामुळे लॉकडाऊन न वाढवता ते शिथील करण्यात आले आहे. 9 जुलैपासून जिल्हय़ातील सर्व दुकाने, बाजारपेठा सुरू केल्या जाणार आहेत.
सकाळी नऊ ते पाच या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याच्या कालावधीत शासनाने दोन तासांची वाढ केली आहे. त्यामुळे ही दुकाने आता सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. सायंकाळी सात ते सकाळी नऊ या काळात संचारबंदी कायम राहणार आहे. लॉकडाऊन शिथील करण्यात आले असले, तरी पूर्वीप्रमाणेच सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे हे नियम पाळावे लागणार आहेत. जिल्हय़ाच्या सीमा बंदच राहणार असून ई-पास शिवाय कोणालाही बाहेर जाता येणार नाही किंवा जिल्हय़ात येताही येणार नाही.
लॉजमध्ये 33 टक्केच निवास व्यवस्था
शासनाने हॉटेल सुरू करण्यास परवानगी देताना निवास व्यवस्था म्हणजेच लॉज सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र लॉजमध्ये 33 टक्केच निवास व्यवस्था करण्यात येणार आहे. उर्वरित 67 टक्के भाग क्वारंटाईनसाठी राखून ठेवावा लागणार आहे. रेस्टॉरंट सुरू करण्यास मात्र अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. रेस्टॉरंट, धाबे यांना पार्सल सेवा देता येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
गणेशोत्सव काळात प्रवेशबंदी विचाराधीन
गणेशोत्सव काळामध्ये जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात चाकरमानी येणार आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावर एक प्राथमिक बैठक झाली. त्यानंतर पुन्हा ‘झुम’वर एक बैठक होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भातील प्रस्ताव शासनाला पाठविला जाणार आहे. विशेषत: गणेशोत्सव काळात जिल्हा प्रवेश बंदी करणे विचाराधीन आहे. त्या बाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवून मान्यता मिळाल्यावरच अंमलबजावणी केली जाणार आहे.
भजने, आरत्या आपापल्या घरापुरत्याच
गणेशोत्सव काळाकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना ग्रामपंचायतीकडून चांगल्या प्रकारे राबविल्या जात आहेत. त्याची अंमलबजावणी झाली, तर कोरोनावर नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे. चाकरमान्यांनीही गावी लवकरच येण्याचा विचार करायला हवा. तसेच गणेशोत्सव काळात आपापल्या घरापुरतेच भजन, आरत्या, पूजा केल्यास व चाकरमान्यांना स्वतंत्र खोलीमध्ये क्वारंटाईन करून कुणीही संपर्कात येणार नाही, याची काळजी घेतल्यास कोरोनावर मात करता येईल. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे अपेक्षित असून गणेशोत्सव काळासाठी आखण्यात येणाऱया उपाययोजनांचे आदेश लवकरच जाहीर करण्यात येतील, असे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले.