आणखी एका टेस्टनंतर मिळणार डिस्चार्ज
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ातील श्रृंगारतळी येथील एकमेवर कोरोनाग्रस्त रोगमुक्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. कोरोनाविरोधात व्यापक जनजागृती व तपासणी मोहीम सुरू असून जिह्यात सध्या 858 जण होमक्वारंटाईन असून मुंबई, पुण्यातून आलेल्या 58 हजार लोकांवर आरोग्य यंत्रणेने वॉच ठेवला असल्याची माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी जिह्यात जीवनावश्यक वस्तू घरपोच व्हाव्यात म्हणून स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने यंत्रणा राबवण्यात येत आहे. नगरसेवक तसेच सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक समिती तयार करण्यात आली असून त्याद्वारे लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्व लोकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, अपर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड आदी उपस्थित होते.
दुबईहून शृंगारतळीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा हाय अलर्टवर गेला होता. या रूग्णावर जिल्हा रूग्णालयात आयसोलेशनमध्ये उपचार सुरू होते. त्याला उत्तम प्रतिसाद दिल्याने हा रूग्ण दुसऱया तपासणीतही निगेटीव्ह आढळल्याने तो कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी स्पष्ट केले. या रूग्णाचा तिसरा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गरज भासल्यास खासगी रूग्णालयांचे अधिग्रहण
जिह्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दुर्दैवाने संसर्गाचे प्रमाण वाढल्यास जिल्हा शासकीय रुग्णालयाचे रूपांतर कोरोना रुग्णालयात करण्यात येईल. गरज भासल्यास जिल्हय़ातील खासगी रुग्णालयांचे अधिग्रहण करण्यात येईल. तेथील सर्व सेवा शासकीय रुग्णालयाच्या रुग्णांकरता वापरण्यात येतील. ही रुग्णालये शासकीय रुग्णालये म्हणून काम करतील. 491 खासगी डॉक्टरांनी ओपीडी चालवण्याचे मान्य केले असून सुमारे 2000 डॉक्टर यासाठी उपलब्ध असल्याचे सामंत यांनी सांगितले.
जेएसडब्ल्यूचा प्रतिसाद नाही
खासगी कंपन्यांनी सामाजिक जबाबदारी अंतर्गत कोरोनाविरोधातील लढाईसाठी अधिकाधिक निधी द्यावा अशी अपेक्षा आहे. जेएसडब्ल्यू कंपनीला 10 व्हेंटीलेटर देण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र कंपनीकडून काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत सामंत यांनी व्यक्त केली. दरम्यान, अन्य कंपन्यांनी स्वतःहून पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले, एकमेव रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. मात्र घरोघरी रुग्णांवर लक्ष ठेवण्याचे गाव पातळीवरील उद्दिष्ट वाढवून देण्यात आले आहे. मजूरांसाठी पॅम्प बनवण्याचे काम सुरु आहे. गुहागरमध्ये सीमा अधिक भक्कम करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे धान्य देण्याची कार्यवाही लवकरच सुरु हाईल. नगरपरिषद कर्मचारी त्यांना नेमून दिलेले काम करत आहेत.
58 हजारांवर लक्ष्य
मुंबई, पुण्याहून 58 हजार लोक रत्नागिरी जिह्यात आले आहेत. त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात आले आहे. जिह्यातील नर्सिंग कॉलेज आणि वैद्यकीय महाविद्यालये यांच्या सेवा अधिग्रहीत करण्याबद्दल प्रस्ताव चालू आहे. जिह्याच्या बाहेरून स्थलांतरीत मजूर येत असतील तर त्यांना तेथेच पॅम्प लावून क्वारंटाईन म्हणून ठेवण्यात येईल.
43 गुन्हे दाखल
अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड म्हणाले, कारोना साथीनंतर रत्नागिरी जिह्यात 33 दखलपात्र तर 10 अदखलपात्र असे एकूण 43 गुन्हे नोंदवले गेले आहेत. सध्या वाहतूकीसाठी ई-पास देण्यात येत आहेत. त्याकरिता पोलीस कर्मचारी वाढवण्यात आले आहेत. 19 पोलीस कर्मचारी लॅपटॉपसह हे काम करत आहेत. 4,300 अर्ज प्रलंबित असून 1453 एवढे वाहतूक परवाने देण्यात आले आहेत.
दवाखाने न उघडल्यास डॉक्टरांवर कारवाई
खासगी डॉक्टर्सनी त्यांचे दवाखाने सुरु ठेवावेत. जे खासगी डॉक्टर अडचणीच्या काळात दवाखाने बंद ठेवतील त्या सर्वांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. मंगळवारी अशा डॉक्टरांविरुद्ध नोटीसा जारी करण्याची कारवाई करण्यात येईल. डॉक्टरांनी अशा नोटीसीचा मुद्द येण्यापेक्षा आपले दवाखाने व हॉस्पीटल नियमितपणे सुरु ठेवावीत. संशयित कोरोनाग्रस्त असल्यास त्याला शासकीय रुग्णालयात पाठवावे.
स्वाईन विरोधात प्रशासन सज्ज
रत्नागिरी जिह्यात 5 जण स्वाईन फ्ल्यूने ग्रस्त असल्याचे तपासणी अहवालात दिसून आले. खेड तालुक्यात आढळलेल्या स्वाईन रूग्णांमुळे कोरोनाशी लढणाऱया प्रशासनासमोर आणखी एक आव्हान उभे ठाकले आहे. या आजाराचाही मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.