पंचायतमंत्री गुदिन्हो यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
जिल्हा पंचायत निवडणुकीत मिळालेले भरघोस यश हे भाजपचे काम, कार्य, विकास, विविध योजना पाहूनच लोकांनी ठेवलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे, असे मत पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केले.
पणजीत भाजपा मुख्यालयात आयोजित उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, पक्षाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यासह उत्तर गोवा जि. पं. अध्यक्ष कार्तिक कुडणेकर, उपाध्यक्ष दीक्षा कानोळकर, दक्षिण गोवा अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, उपाध्यक्ष खुशाली वेळीप यांची उपस्थिती होती. त्याशिवाय अन्य सर्व जि. पं. सदस्यही उपस्थित होते.
गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्हा पंचायतींना अधिकार द्या, अशी मागणी होत होती. यंदापासून ते अधिकार त्यांना मिळणार असून त्यासाठी केंद्राकडून प्रथमच 75 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे, त्यामुळे विकासास भरपूर वाव मिळणार असल्याचे गुदिन्हो म्हणाले. गत काही जि. पं. निवडणुकीवेळी राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शक्य तेवढय़ा लवकर राज्यातील खाणी सुरू करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. त्याच बरोबर 10 हजार नोकऱया देण्यासंबंधी दिलेले आश्वासनही पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार आहे. त्यादृष्टीने पुढील महिन्यापासून नोकरीसंबंधी जाहिराती प्रसिद्ध होणार असून राज्यातील युवकांनी अर्ज करावे. जे पात्र असतील त्यांना नक्की नोकऱया मिळतील. परंतु ज्यांना ही नोकरी मिळत नाही त्यांनी निरुत्साहित न होता स्वतःचा व्यवसाय किंवा चांगल्या खासगी कंपन्यात प्रयत्न करावे, असे गुदिन्हो म्हणाले.
उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी बोलताना, जि. पं. निवडणुकीत भाजपला मिळालेला कौल पाहता विरोधक केवळ विरोधासाठी विरोध करत होते हे सिद्ध झाले आहे, असे सांगितले. विजयी झालेल्या सर्व सदस्यांनी मतदारांच्या विश्वासास पात्र ठरावे, सरकारकडून मिळणाऱया निधीचा मतदारसंघाच्या विकासासाठी योग्य विनीयोग करावा व अधिक चांगल्या रितीने काम करावे, असे आवाहन केले.
दक्षिण गोवा जि. पं. अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांनी मनोगत व्यक्त करताना भाजपमुळेच आपण आज या पदापर्यंत पोहोचले असे सांगितले. मतदारांनी ठेवलेल्या विश्वासास पात्र ठरण्याचे प्रयत्न करणार आहे. तसेच आत्मनिर्भर भारत संकल्पनेतील योजना समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कटीबद्ध असून याकामी सर्व सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. उत्तर गोवा अध्यक्ष कुडणेकर यांनीही विचार मांडले.