प्रतिनिधी/ सातारा
हद्दवाढ होण्यापूर्वी, जिल्हा परिषदेस 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाने पूर्वीच्या शाहुपूरी, विलासपूर, खेड या ग्रामपंचायतीकरीता दिलेला निधी हद्दवाढ झाल्याने, नगरपरिषदेला वितरित करण्याबाबत ग्रामिण विकासमंत्री हसन मुश्रीफ यांना प्रस्तावित केले होते. त्यानुसार पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला या भागासाठी प्राप्त झालेला सुमारे 2 कोटींपेक्षा जास्त निधी नगरपरिषदेकडे वर्ग करण्यास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंजूरी दिली आहे, अशी माहिती साविआचे अध्यक्ष, खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
याविषयी खासदार उदयनराजे भोसले यांनी अधिक माहिती देताना पत्रकात नमुद केले आहे की, केंद्राने ग्रामिण विकासाकरीता 15 व्या वित्त आयोगामधुन बंधीत निधीचा पहिला हप्ता, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तराकरीता 10ः10ः80 या प्रमाणात वितरीत केला होता. दरम्यानच्या काळात, संपूर्ण शाहुपूरी, विलासपूर, खेड, दरे या ग्रामपंचायतींचा भाग सप्टेबर 2020 मध्ये सातारा नगरपरिषदेमध्ये समाविष्ट करण्यात येवून, सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला.
तत्पूर्वी जुन्या ग्रामपंचायतींच्या विकासाकरीता 15 व्या वित्त आयोगातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावरील अनुक्रमे 10 टक्के आणि 80 टक्के निधी संबंधित यंत्रणेकडेच जमा होता. आता हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागाचा विकास पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद करु शकत नसल्याने, या भागाच्या विकासाकरीता त्यांचा हिस्सा नगरपरिषदेकडे वर्ग करण्याबाबत आम्ही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच प्रस्ताव पाठविल्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांची समक्ष भेट घेवून तसेच दि. 24 ऑगस्ट रोजी पत्र देवून, सदरचा सुमारे 2 कोटींपेक्षा जास्त निधी नगरपरिषदेकडे वर्ग करण्याबाबत पाठपुरावा केला होता.
त्यानुसार नुकतीच सदरचा सुमारे 2 कोटी 38 लाख रुपयांचा निधी नगरपरिषदेकडे वर्ग करण्यास मंत्री मुश्रीफ यांनी मंजूरी दिलेली आहे. लवकरच जिल्हा परिषदेच्या स्तरावरुन, सदरचा निधी नगरपरिषदेकडे वर्ग केला जावून, हद्दवाढ भागातील कामे पूर्ण करणासाठी जादा निधी उपलब्ध होईल.
नगरपरिषदेने नुकत्याच झालेल्या तिच्या स्थायी आणि सर्वसाधारण सभेमध्ये हद्दवाढ भागासाठी विविध अत्यावश्यक कामे नगरपरिषदेच्या निधीतुन मंजूर केलेली आहेत. अशावेळी हद्दवाढ भागातील प्रलंबीत निधी जिल्हा परिषदेकडून या भागाच्या विकासाकरीता सुमारे अडिच कोटी निधी उपलब्ध होत असल्याने, हद्दवाढ भागातील अतिआवश्यक कामे पूर्ण होण्यास कोणती समस्या उद्भवणार नाही.
हद्दवाढ भागासह शहराचा सातत्यपूर्ण विकास साधण्याचा, सातारा विकास आघाडीने दिलेल्या वचनाची वचनपूर्ती होत असल्याने त्याचे विशेष समाधान आहे असेही पत्रकात म्हटंले आहे.