शेतकऱयांना मिळणार साठवणूक स्वातंत्र्य, केंद्र सरकारचे अनेकए महत्वाचे निर्णय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शेतकरी आणि उद्योजक यांच्या विकासासाठी केंद्र सरकारने आणखी सहा महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली आहे. शेतकऱयांच्या उत्पादनांना चांगली किंमत मिळावी, यासाठी तेल, कांदा, डाळी आणि बटाटा व काही धान्ये यांना जीवनावश्यक वस्तूंच्या सूचीतून वगळण्यात आले आहे. यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्यात व्यापक परिवर्तन करण्यात आले आहे. लघु व मध्यम उद्योजकांसाठीही अनेक दिलासादायक निर्णय घेण्यात आले आहेत.
आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत पॅकेज काही दिवसांपूर्वी घोषित करण्यात आले होते. त्यावर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. या पॅकेजसाठी आता केंद्र सरकारने आपली तिजोरी खोलली असून आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
कृषीमालावरची निर्बंधांची तलवार दूर
आजवर निर्बंधित असलेल्या धान्य, तेल, तीळ, डाळी, कांदा, बटाटा इत्यादी वस्तूंच्या साठवणुकीची अनुमती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे दर ठरविण्याचा अधिकारही शेतकऱयाला मिळणार आहे. स्वामीनाथन आयोगाची ही महत्वपूर्ण सूचना होती. ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्वाची पावले केंद्र सरकारने उचलली आहेत. यामुळे आता शेतकरी या मालाची साठवणूक करून योग्य किंमत आल्यानंतर त्यांची विक्री करू शकणार आहे. ही मुभा देण्याची मागणी शेतकरी गेली 50 वर्षे करीत होते. ती बुधवारी पूर्ण करण्यात आली.
कोठेही माल विकण्याची अनुमती
नव्या निर्णयानुसार शेतकरी आपली कृषी उत्पादने देशात कोठेही विकू शकणार आहे. त्यामुळे त्याला स्पर्धात्मक किंमत मिळणार असून त्याचा लाभ होणार आहे. शेतकऱयांचे उत्पान्न दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे ध्येय असून त्याच्या पूर्तीसाठी केंद्राने प्रयत्न चालविला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांना दिली.
जास्त किंमतींसाठी अभिनव निर्णय
शेतकऱयांना त्याच्या उत्पादनांसाठी जास्त किंमत मिळावी, तसेच देशभर जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी बळकट व्हावी यासाठी अभिनव निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जर एखादा निर्यातदार, प्रक्रियादार व उत्पादन त्यांकडील कृषी उत्पादनांची आदलाबदल करून विक्री करू शकणार आहेत. यामुळे कोणत्याही कृषीउत्पादनाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता कमी करण्यात आली आहे. यातून उत्पादक शेतकऱयाचाही लाभ होईल असे प्रतिपादन करण्यात आले.
सहा अभिनव निर्णय…
ड शेतकऱयाला त्याची कृषीउत्पादने कोणत्याही बाजारपेठेत विकण्याची अनुमती
ड कृषीउत्पादनांची निर्यात करण्याचेही स्वातंत्र्य, कायद्यात आवश्यक ते बदल
ड तेल, डाळी, कांदे, बटाटे, धान्ये आता जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या बाहेर
ड एक देश एक बाजारपेठ या धोरणाच्या दिशेने उचलली निर्णायक पावले
ड कृषी उत्पादनांची पुरवठा साखळी बळकट करण्यासाठी महत्वाचा निर्णय
ड उद्योगांसाठी प्रत्येक मंत्रालयात प्रकल्प विकास कक्ष बनविण्याची केली योजना
ड कोलकाता बंदराला जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींचे नाव
ड फार्मोकोपिया संबंधी आयुष मंत्रालयाचा निर्णय, होमिओपॅथीचा समावेश