प्रतिनिधी / कोल्हापूर
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सरकारी रस्त्यावर उतरले. जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकिय कार्यालयांसमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने करुन ठिय्या आंदोलन केले. संघटनेचे राज्य संघटक अनिल लवेकर व जिल्हाध्यक्ष वसंत डावरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, सी.पी.आर. रुग्णालय, शासकीय मुद्रणालय, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण उपसंचालक कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, राजाराम कॉलेज, शासकीय तंत्रनिकेतन, आय.टी.आय्., कळंबा कारागृहासह तसेच पन्हाळा, गडहिंग्लज, चंदगड, गगनबावडा, हातकणंगले, शाहूवाडी, भुदरगड या तालुक्याची तहसिल कार्यालये आदी ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे की, दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पासून राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचायांना महाराष्ट्र राज्य शासनाने अंशदायी पेन्शन योजना लागू केली. त्याला पहिल्यापासूनच मध्यवर्ती संघटनेने विरोध केला. दरम्यान सन 2015 पासून सदर पेन्शन योजनेचे रूपांतर राष्ट्रीय पेन्शन योजनेत करण्यात आले. त्यालाही संघटनेचा विरोध आहे. कारण सदर पेन्शन योजना बेभरवशाची आहे. तसेच यामुळे कर्मचारी व अधिकारी वर्गाचे आर्थिक नुकसानच होणार आहे.
या आंदोलनात अकिल शेख, अनिल खोत, विठ्ठल बेलवणकर, रमेश भोसले, सुधाकर भांदिगरे, संजय क्षीरसागर, महेश सावंत, नंदकुमार इंगवले, सुधाम पाटील, पांडूरंग पाटील, अजित खाडे, एन. बी. बारगीर, उदय लांबोरे, बापू राणे, सतीश ढेकळे, आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.