प्रतिनिधी/ बेळगाव
शाळा कधी सुरू होणार? असा प्रश्न शिक्षक, पालक, संस्थाचालक यांना पडला असला तरी जुलै महिन्याच्या दरम्यान शाळा सुरू करावी, असे ‘लान्सेट कोविड कमिशन इंडिया टास्क फोर्स’ने सुचविले आहे. कोविड-19 च्या दुसऱया लाटेच्या दरम्यान सर्व बाजूंनी विचार करून तज्ञांनी ही सूचना केली आहे.
पूर्ण लॉकडाऊन किंवा संचारबंदीऐवजी टप्प्याटप्प्याने काही नियम किंवा व्यवसाय बंद अशी सूचनाही या रिपोर्टमध्ये करण्यात आली आहे. आगामी दोन महिने शिक्षण क्षेत्राने तयारीसाठी घ्यावेत व जुलैमध्ये शाळा-कॉलेज सुरू कराव्यात, असे अहवालात म्हटले आहे.
दहा किंवा अधिक व्यक्तींच्या एकत्रित येण्यावर दोन महिने निर्बंध आणावेत, तसेच काही काळ अशा एकत्रित समारंभांवर बंदी आणावी, असेही तज्ञांनी सुचविले आहे. राज्यातील बहुसंख्य तज्ञांनी या अहवालाला संमती दर्शविली आहे. गतवषी झालेला लॉकडाऊन हा आपल्याला बरेच काही शिकवणारा ठरला. ऑक्सीजन, बेड्स, व्हेंटिलेटर्स यांची तरतूद करावी लागली. यावषी बेड्स पुरेसे नसले तरी सरकार खासगी हॉस्पिटलशी बेडबाबत चर्चा करत आहे.
येत्या दोन-तीन महिन्यात कोरोना लाटेची तीव्रता कमी होईल व पॉझिटिव्हची सरसरी दोन ते पाच टक्के होईल. त्यादरम्यान शाळा-कॉलेज सुरू करण्यास हरकत नाही, असे कोविड टेक्निकल ऍडव्हायजरी कमिटीचे डॉ. प्रदीप बनदूर यांनी म्हटले आहे.
सरकारने खासगी उत्पादक कंपन्यांना लस निर्मिती करण्यासाठी मान्यता द्यावी, त्यांच्याशी सलग्न राहावे. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून अधिक प्रतीक्षा न करता लस निर्माण करण्यास प्रारंभ करावा, असे पब्लिक हेल्थ फौंडेशन ऑफ इंडियाचे डॉ. गिरीधर बाबू यांनी म्हटले आहे.