आयसीसी पॅनेलमधील आंतरराष्ट्रीय पंच अनिल चौधरी यांची कैफियत, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात नेटवर्कची समस्या कायम
वृत्तसंस्था / शामली
लॉकडाऊनमध्ये घरी थांबायचे असेल तर इंटरनेट हे सर्वात मोठे साधन आहे. पण, नेटवर्कची समस्या प्रचंड आहे. सर्वसामान्यांचे सोडून द्या. पण, अगदी आंतरराष्ट्रीय पंच अनिल चौधरी यांना देखील मागील 20 दिवसांपासून नेटवर्कच्या समस्येने अक्षरशः जेरीस आणले असून ते जिथे राहतात, तिथे केवळ उंचीच्या ठिकाणावरच नेटवर्क येत असल्याने चौधरी यांना नेटवर्कसाठी थेट झाडावर चढले तरच संपर्क करता येत आहे.
आयसीसी ईलाईट पॅनेलमधील आंतरराष्ट्रीय पंच अनिल चौधरी हे उत्तर प्रदेशमधील कांधला नजीक डांगरौल गावचे निवासी. वेळ मिळेल त्या वेळी ते आपल्या गावी येत असतात. 20 दिवसांपूर्वी ते आपल्या गावी आले आणि लॉकडाऊन कालावधीत पूर्ण वेळ ते गावीच राहिले. अर्थात, गावी आल्यानंतर नेटवर्कची समस्या सुरु झाली. नेटवर्क नसल्यामुळे फोन चालत नाहीत आणि इंटरनेट असण्याचा तर प्रश्नच येत नाही. अर्थात, गावापेक्षा किंचीत उंचीवर असलेल्या शेती भागात मात्र फोनचे नेटवर्क येते आणि यामुळे गावकरी नेटवर्कसाठी अशा उंचीच्या ठिकाणी जातात.
अनिल चौधरी यांनाही हेच करावे लागत आहे. त्यांची आई व पत्नी दिल्लीतच आहेत. जेव्हा अतिशय महत्त्वाचे कॉल करायचे असतात, त्यावेळी अनिल चौधरी यांची पावले थेट शेताकडे वळतात. ते एखाद्या झाडावर चढतात, तेथे नेटवर्क येते आणि कॉल झाल्यानंतर ते पुन्हा घरी परततात. आंतरराष्ट्रीय पंचांच्या व्हीडिओ कॉन्फरन्सवर बैठका होतात, त्या बैठकांना हजर राहणे चौधरी यांना शक्य होत नाही. पण, जे महत्त्वाचे कॉल असतात, ते चौधरी कसेबसे पूर्ण करत आहेत.
एरवी अनिल चौधरी दिल्लीत राहतात आणि मुलांच्या शाळा, क्लास सर्व काही दिल्लीतच आहे. सध्या सर्व शाळा बंद आहेत. पण, क्लासेस ऑनलाईन होत आहेत. कोरोना व्हायरसचा प्रकोप उग्र स्वरुप धारण करण्यापूर्वी अनिल चौधरी यांना भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आयोजित 3 वनडे सामन्यात पंच म्हणून काम पहायचे होते. पण, ती मालिका अर्ध्यातच रद्द करण्यात आली आणि त्यानंतर चौधरी आपल्या दोन मुलांसह उत्तर प्रदेशकडे आपल्या निवासस्थानी रवाना झाले. 16 मार्च रोजी ते डांगरौल येथे दाखल झाले. एक आठवडा येथे थांबून दिल्लीला परतण्याचा त्यांचा विचार होता. पण, जाण्याचा विचार असतानाच लॉकडाऊनची घोषणा झाली आणि ते आपल्या मुलांसह तेथेच अडकून पडले.
उत्तर प्रदेशमधील डांगरौलसह जेथे-जेथे नेटवर्कच्या अडचणी आहेत, त्या दूर कराव्यात, अशी मागणी अनिल चौधरी यांनी प्रशासनाकडे केली आहे.