राजस्थानमधील झालावाड येथे संचारबंदी : बर्ड फ्ल्यूच्या पुष्टीनंतर राजस्थानात खळबळ
वृत्तसंस्था/ जोधपूर
राजस्थानात जोधपूरनंतर झालावाडमध्येही मोठय़ा संख्येत कावळय़ांचा मृत्यू झाला आहे. झालावाडमध्ये एवियन इन्फ्लुएंजामुळे (एकप्रकारचा बर्ड फ्ल्यू) कावळय़ांच्या मृत्यूच्या पुष्टीनंतर राज्यात पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करणाऱयांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. झालावाड जिल्हा प्रशासनाने बालाजी क्षेत्रात बुधवारी रात्री उशिरा संचारबंदी लागू केली आहे.
बालाजी क्षेत्रातच 25 डिसेंबरपासून सातत्याने कावळय़ांचा मृत्यू होत आहे. तेथे 100 हून अधिक कावळय़ांचा मृत्यू झाला आहे. तर मोठय़ा संख्येत कावळे आजारी पडले आहेत. कावळय़ांच्या शरीरातून प्राप्त नमुने तपासणीसाठी भोपाळ येथेही पाठविण्यात आले आहेत.
कोटा येथून तज्ञांचे पथक गुरुवारी झालावाड येथे पोहोचले आहे. हे पथक कावळय़ांची वैद्यकीय तपासणी करणार आहे. कावळय़ांमध्ये एवियन इन्फ्लुएंजाची पुष्टी झाल्यावर शहरातील सर्व पोल्ट्री फार्म तसेच याच्याशी संबंधित दुकानांमधून नमुने प्राप्त केले जात आहेत. तर बालाजी क्षेत्रातील पोल्ट्री आणि अंडय़ांच्या दुकानांमधील विक्री बंद करण्यात आली आहे.
बालाजी क्षेत्रात राहणाऱया लोकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रशासनाने या क्षेत्रात धान्यासह अन्य सामग्री पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. संचारबंदी कधी हटणार याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.
चिंता वाढली
राज्यात सर्वप्रथम जोधपूरमध्ये कावळय़ांच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले होते. शहरातील एका भागात सुमारे आठवडाभरापासून दररोज मृत कावळे आढळत आहेत. मंगळवारी 32 तर बुधवारी 15 कावळे मृत आढळले आहेत. हा प्रकार चर्चेत येताच पशुपालन विभागाने कावळय़ांच्या शरीरातून नमुने प्राप्त करत भोपाळ येथे पाठविले आहेत. रानीखेत नावाच्या आजारामुळे कावळय़ांचा मृत्यू होत असल्याची शक्यता प्रारंभी जोधपूरमधील काही तज्ञांनी व्यक्त केली होती. तर झालावाडमध्ये एवियन इन्फ्ल्युएंजाची पुष्टी झाल्यावर चिंता वाढली आहे.