संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. वा. पु. गिंडे यांच्या जीवनातील आठवणींना उजाळा : अनेक विद्यार्थ्यांना नेहमीच केले मार्गदर्शन
मनीषा सुभेदार / बेळगाव
ज्ञानेश्वरीसह संतसाहित्याचे गाढे अभ्यासक असणारे डॉ. वा. पु. गिंडे सर गेले आणि ‘सारेच दीप कसे मंदावले आता’ अशीच काहीशी अवस्था झाली. आपले मत स्पष्टपणे व्यक्त करणे, त्या मागची कारणमीमांसा पटवून देणे आणि दुसऱयाचे मत जर पटले तर सहजपणे त्याचा स्वीकारही करणे, हे सरांच्या स्वभावाचे वैशिष्टय़ होते. रुढार्थाने मी त्यांची विद्यार्थिनी नव्हे, परंतु ‘तरुण भारत’मध्ये रुजू झाल्यापासून त्यांचा परिचय वाढला आणि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे आपल्या वाटचालीवर जडणघडणीवर बारकाईने लक्ष असावे, तसेच सरांचे लक्ष नेहमी राहिले.
सरांचे वडील पुरुषोत्तम हे ज्ञानेश्वरीमय झालेले व्यक्तिमत्त्व. वडिलांचा वारसा सरांमध्ये आलाच नसता तर नवल. इंदिरा व पुरुषोत्तम यांच्या पोटी 19 जानेवारी 1937 साली त्यांचा जन्म झाला. शिक्षणाच्या तळमळीने त्यांनी पीएचडीपर्यंत मजल गाठली. त्यानंतर ते अध्यापन करण्यात सदैव आनंदी राहिले. मात्र, विद्यार्थ्यांना शिकविता शिकविता मीच शिकत राहिलो, ही त्यांची भावना कायम होती.
काहीकाळ कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर श्रीरामपूर, पंढरपूर आणि पुन्हा कोल्हापूर असा त्यांचा प्रवास झाला. पंढरपूरमधील 14 वर्षांचे वास्तव्य हे त्यांच्यासाठी आणि अभ्यासासाठी स्मरणीय ठरले. सरांनी अनेक पुस्तके लिहिली तरीही ज्ञानेश्वरी हा त्यांच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू राहिला. काळानुरूप बदलत चाललेल्या शिक्षणपद्धतीबद्दल ते नाराज होते. आपला विद्यार्थी परीक्षार्थी होतो आहे की काय ही चिंता त्यांना सदैव कुरतडत असे.
त्यांच्याच ‘चांगदेव पासष्टी’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, ‘तत्त्वज्ञानाचे निरुपण करताना प्रकट झालेले काव्याचे स्रोत याचा विद्यार्थ्याने साकल्याने विचार करावा, अशी अपेक्षा असते पण असे दिसत नाही. इतकेच काय नियुक्त केलेला एखादा अध्याय सर्वांगीण स्वरुपात वाचणारे विद्यार्थीही आजकाल दुर्मीळ होत चालले आहेत. विद्वत्ता, व्यासंग वाढविणे, त्याच्या सहवासात आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या कक्षा समृद्ध करण्याचा विचार, आजचा एकंदर परीक्षार्थी काळ महिम्यात बाजूला चालला आहे, ही त्यांची वेदना होती. म्हणूनच अभ्यासू असणारा विद्यार्थी भेटला की अजूनही आशा करावयास वाव आहे, याचा आनंद ते व्यक्त करत.
कोणाचेच जीवन कधीच ‘गुलाबाच्या ताटव्या’प्रमाणे नसते. गुलाबाचे काटे टोचून घ्यावेच लागतात. त्याला पर्याय नसतो. परंतु अशावेळी एखादी सोबत खूप ‘आश्वस्त’ करते. सरांच्या जीवनाच्या वाटचालीत भोवंडून जावे असे अनेक प्रसंग आले. परंतु त्या प्रत्येकवेळी ज्ञानेश्वरीने त्यांची सोबत केली आहे. वाटच दिसेनाशी झाली तेव्हा ज्ञानेश्वरीच्या ओवीने हरविलेली वाट पुन्हा दाखवली आणि मला पुढे नेले, ही त्यांची भावना त्यांनी अनेकदा व्यक्त केली आहे.
आजच्या तरुणाईला अध्यात्म, ज्ञानेश्वरी, गीता यांचे महत्त्व कधी कळेल, असा प्रश्न त्यांना नेहमीच पडत असे. श्रे÷ कलाकृती कधीच शिळी होत नाही, असे ते मानत. परंतु हे कळेल तो दिन भाग्याचा, असेही त्यांना वाटून जात असे. आपल्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी नेहमीच मार्गदर्शन केले. परंतु कोणीही अपरिचिताने त्यांना एखाद्या संदर्भासाठी विचारणा केली तर त्याचे पूर्ण शंका निरसन होईपर्यंत मार्गदर्शन करण्यात त्यांना आनंद होत असे.
कोणत्याही ऐहिक संपत्तीपेक्षा माझे विद्यार्थी ही माझी संपदा आहे, ही त्यांची भावना होती. त्यामुळेच ‘श्री ज्ञानेश्वरी सातवा अध्याय’ हे पुस्तक त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना अर्पण केले आहे. ‘अध्यापनाच्या प्रदीर्घ वाटचालीत ज्या अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपले अध्ययन जिवंत ठेवले त्या सर्व विद्यार्थ्यांना’ असे त्यांनी अर्पण पत्रिकेत नमूद केले आहे. संशोधन, चिंतन, लेखन यामध्ये व्यस्त असणाऱया, त्यासाठी झपाटून गेलेल्या व्यक्तीसमवेत संसार करणे ही त्यांच्या पत्नीची परीक्षा असते. वा. पु. गिंडे सरांना याची नितांत जाणीव होती. म्हणूनच ‘शेक्सपिअर आणि मराठी नाटक-तौलनिक अभ्यास’ हे पुस्तक त्यांनी गीता या आपल्या सहचारिणीस अर्पण केले
आहे.
आधारच तुझा पायाखालून निघून गेला एकाएकी
कळत नाही, ज्यावर अजून मी चालत आहे,
तुझ्यावाचून वाट एकाकी?
… कसे निभावून गेलो कळले नव्हते,
तसे काहीच जवळ नव्हते
नुसते हात हाती होते
ही त्यांची पत्नीबद्दलची भावना कोठेतरी वाचकांना सुखावूनही जाते. ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाचे श्रेय त्याला देणे, हे वा. पुं. चे वैशिष्टय़ होते. हिंडत फिरत होते तोपर्यंत ‘तरुण भारत’, ‘लोकमान्य ग्रंथालय’, ‘सरस्वती वाचनालय’ येथे त्यांची ये-जा असायची. सरस्वती वाचनालयाच्या नूतन इमारतीच्या वास्तुशांतीदरम्यान काढलेल्या स्मरणिकेचे नाव ‘ज्ञानदीप’ असे त्यांनी सुचविले होते.
वा. पु. सर गेले आणि त्यांच्याशी आजपर्यंत झालेल्या अनेक चर्चा आठवत राहिल्या. कोरोनाने परिस्थिती भीषण केली हे तर खरे, परंतु त्यांनी अनेक माणसांना प्रत्यक्ष भेटीपासून दूर ठेवले, ही वेदना नेहमीच ठसठसत राहणार आहे.