केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल अन् विस्तार लवकरच – भाजपप्रवेशाच्या 15 महिन्यांनी मोदी मंत्रिमंडळात स्थान शक्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मध्यप्रदेशात मागील वर्षी मार्च महिन्यात कमलनाथ सरकार सत्तेवरून पायउतार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजप लवकरच मोठी जबाबदारी देणार आहे. मोदी सरकारमध्ये मंत्रिपद त्यांना मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. दुसऱया कार्यकाळातील दोन वर्षे पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या तयारीत आहेत. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह तसेच भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्यात शुक्रवारी बैठक झाली आहे. या बैठकीनंतर सिंधिया यांना केंद्र सरकारमध्ये स्थान मिळणार असल्याचा दावा त्यांचे समर्थक करू लागले आहेत.
सिंधिया यांना रेल्वेची धुरा मिळू शकते असे एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे. पण त्यांना शहर विकास तसेच शिक्षण यासारखे महत्त्वाचे विभाग देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. सिंधिया यांच्या भाजपप्रवेशला 15 महिने उलटले आहेत. भाजप आता त्यांना महत्त्वाचे पद देणार असल्याचे संकेत दिल्लीपासून मध्यप्रदेशापर्यंत मिळत आहेत.
कार्यक्षम मंत्र्याचा ठसा
ज्योतिरादित्य यांना मोदी मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री केले जाणार असल्याचे मानले जात आहे. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये सिंधिया यांनी स्वतःच्या कामामुळे एक कार्यक्षम मंत्री म्हणून ठसा उमटविला होता. यावेळी मोदी सरकारमध्ये सामील झाल्यास त्यांच्याकडून पुन्हा उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
नव्या नेतृत्वावर लक्ष
भाजपचा भर आता पक्षात युवा नेतृत्व विकसित करण्यावर आहे. हेच लक्षात घेत मोदी सरकारमध्ये मध्यप्रदेशातून ज्योतिरादित्य सिंधिया, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ओडिशाचे बैजयंत पांडा यांच्यासह अनेक युवा चेहऱयांना संधी मिळू शकते.
दुसऱया कार्यकाळात 57 मंत्री
मोदी यांनी पंतप्रधान म्हणून दुसरा कार्यकाळ सुरू करतेवेळी 30 मे 2019 रोजी 57 मंत्र्यांसह शपथ घेतली होती. पण सद्यकाळात त्यांच्या मंत्रिमंडळात 53 मंत्रीच आहेत. रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी यांचे निधन झाले आहे. तर दोन कॅबिनेट मंत्री हरसिमरत कौर बादल आणि अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
4 मंत्र्यांकडे अतिरिक्त प्रभार
केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना लोजपचे नेते रामविलास पासवान यांच्या निधनानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये ग्राहक विषयक मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. नरेंद्र सिंग तोमर यांच्याकडे पूर्वीच कृषी, ग्रामविकास आणि पंचायत राज विभागांची जबाबदारी आहे. अकाली दलाच्या हरसिमरत यांच्या राजीनाम्यानंतर सप्टेंबर 2020 पासून अन्नप्रक्रिया मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी ते सांभाळत आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरणासह नोव्हेंबर 2019 पासून अवजड उद्योग मंत्रालयाचाही प्रभार आहे. श्रीपाद नाईक जखमी झाल्यापासून केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू आयुष मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार सांभाळत आहेत.