हायवे चौपदरीकरण
गावजोड रस्ते, गटार, मोऱया आदी कामांकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष
मागील पावसाळय़ातील समस्या यंदाही राहणार कायम
हायवे अधिकाऱयांची डोळेझाक
लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल नाही
वार्ताहर / कुडाळ:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे झाराप ते पिंगुळी पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. परंतु चौपदरीकरणांतर्गत गावजोड रस्ते, गटार, जोडरस्त्यांच्या काही मोऱया आदी बहुतांशी कामांकडे हायवे ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पावसाळय़ात लोकांना मागील वर्षाच्या समस्यांना यावर्षीही तोंड द्यावे लागणार आहे. हायवे अधिकारी याकडे डोळेझाक करीत आहेत, तर लोकप्रतिनिधींनी सूचना करूनही ठेकेदार व अधिकारी दखल घेत नाहीत. दरम्यान, ही कामे तात्काळ सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा शिवसेना विभागप्रमुख बबन बोभाटे यांनी दिला आहे.
लॉकडाऊनच्या काळात दीड महिना बंद असलेले चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. झाराप ते पिंगुळीपर्यंत चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण करण्यात आले. गटारांची कामे व्यवस्थित पूर्ण केली नसल्याने मागील पावसाळय़ात लगतच्या भातशेतीमध्ये पाणी घुसून नुकसान झाले होते.
झाराप-तिठा ते बायपासपर्यंत गटाराच्या पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे तेथील लगतची घरे, दुकानांसमोर पाणी साचून संबंधित मालकांना त्रास झाला. काही ठिकाणी शेतात पाणी घुसून नुकसान झाले. तेथील ग्रामस्थांनी हायवे एजन्सीसह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले. मात्र, ठेकेदाराने दुर्लक्ष केले. तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्यासमोर ग्रामस्थांनी ही समस्या मांडली. परंतु लोकप्रतिनिधींसमोर संबंधित अधिकारी व ठेकेदार प्रतिनिधी फक्त माना डोलावतात. त्यांच्या सूचनांना ते किंमत देत नाहीत, अशीच परिस्थिती अनुभवायला येत आहे.
झारापसह तेर्सेबांबर्डे, बिबवणे, पिंगुळी आदी गावात जाणाऱया जोडरस्त्यांना 70 मीटरपर्यंत कारपेट करणे बंधनकारक आहे. परंतु झाराप-कुंभारवाडी, हरिजनवाडी, बिबवणे-सार्वजनिक स्मशानभूमी, कुलकर्णीवाडी व अन्य काही जोडरस्त्यांना कारपेट केले नाही. पिंगुळी-साईमंदिर येथून मांडकुलीला जाणाऱया रस्त्यावर कार्पेट केले. परंतु त्या रस्त्याची महामार्गापर्यंत भराव टाकून उंची वाढविली नाही. हे वाहनधारकांसाठी धोक्याचे आहे. ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेले हे रस्ते आहेत. जोडरस्त्यांवर काही ठिकाणी गतिरोधक नाहीत. सूचना फलकही लावलेले नाहीत. झाराप-माणगाव तसेच भावई मंदिराकडे जाणाऱया रस्त्यावर मोरीचे काम व्यवस्थित केले नाही.
साळगाव-जांभरमळा तसेच बिबवणे येथे बॉक्सवेलच्या दुतर्फा सर्व्हिस मार्गांना काँक्रिटचे गटार बांधले आहेत. पावसाळय़ात हायवेचे पाणी या गटारामध्ये येणार आहे. पण त्या पाण्याच्या प्रवाहाला पुढे जाण्यासाठी मार्गच नाही. झाराप-जांभळ येथील शिवाजी महाराजांचा पुतळा संपादीत जागेत आल्याने तो अन्यत्र बांधून देण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले. त्यासाठी तेथे जागाही उपलब्ध करून देण्यात आली. ठेकेदाराने तेथे नुसते स्ट्रक्चर बांधले असून पुढे काहीच हालचाल केली नाही. त्यामुळे ग्रामस्थ व शिवप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे.
झाराप तिठा येथे हा रहदारीचा मुख्य नाका आहे. तेथे एका बाजूलाच बसथांबा बांधण्यात आला. कुडाळला जाणाऱया प्रवाशांसाठी बसथांबा बांधला नाही. त्यामुळे प्रवाशांची पावसाळय़ात गैरसोय होणार आहे.
या अपुऱया कामांकडे स्थानिक ग्रामस्थ व ग्रा. पं. नी ठेकेदार प्रतिनिधी व हायवे अधिकाऱयांचे लक्ष वेधले, तर त्यांची मागणी जुमानत नाहीत. चौपदरीकरणाचे काम पूर्ण करून घेण्याच्या घाईगडबडीत ठेकेदार आहे. अधिकारी त्या कामावर फिरकत नाहीत. त्यामुळे त्या कामावर कुणाचे नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. अपूर्ण कामांकडे लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष जागेवर येऊन सूचना केल्या, तरीही ठेकेदार व अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. या ठेकेदारावर प्रशासन व राजकीय नेत्यांचा वचक नाही, अशी परिस्थिती अनुभवायला येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे.
बोभाटेंचा आंदोलनाचा इशारा
जोडरस्त्यांचे कारपेट, गटार व अन्य काही अपूर्ण कामांचा त्रास ग्रामस्थांना होणार आहे. मागील पावसाळय़ात समस्या निर्माण झाल्यानंतर ठेकेदार व अधिकाऱयांचे वारंवार लक्ष वेधले होते. लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिले, तरीही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. येत्या आठ दिवसांत ही कामे होती घेतली नाहीत, तर ग्रामस्थांसह आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना विभागप्रमुख बबन बोभाटे यांनी दिला आहे.