ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान एका नाराज शेतकऱ्याने शनिवारी रात्री उशिरा टिकरी सीमेजवळच्या एका बागेत गळफास घेतला. आज सकाळी त्याचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
कर्मवीर (वय 50) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तो हरियाणातील जिंदच्या सिंघवाल गावचा रहिवासी आहे. त्याच्याजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये लिहिले आहे की, ‘भारतीय किसान युनियन जिंदाबाद. मोदी सरकार तारखांवर तारखा देत आहे. कधी हे काळे कायदे रद्द होतील, सांगता येत नाही. जोपर्यंत नवे कृषी कायदे रद्द होणार नाहीत, तोपर्यंत येथून जाणार नाही.’
दरम्यान, पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा पोस्टमॉर्टेमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे.