इलेक्ट्रि वाहनांची करणार निर्मिती – वर्षाला 1 लाख वाहने बनवणार
नवी दिल्ली
भारतातील सर्वात मोठी दुचाकी निर्मिती कंपनी टीव्हीएस येणाऱया काळात 1 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून याअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली जाणार आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी कंपनीचा वेगळा स्वतंत्र कारखाना तयार आहे. या कारखान्यातून वर्षाला 1 लाख वाहनांची निर्मिती होणार असून यात दुचाकी व तिचाकींची निर्मिती होणार आहे.
संपूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी सदरचा कारखाना समर्पित असणार असून बॅटरी निर्मितीसोबत इतर भागांची निर्मितीही येथेच केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू यांच्या नेतृत्वाखाली इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीचे कार्य होणार आहे. याकामी जग्वार लँड रोव्हरचे माजी सीईओ राल्फ स्पेथ व सिंगापुरातील गुंतवणूकदार कुओक मेंग झिओंग यांचे सहकार्य लाभणार आहे. 5 ते 25 किलोवॅट गटात दुचाकी, तिचाकी बनवल्या जाणार असून इलेक्ट्रिक वाहन आणण्याबाबत गेल्या दशकभरापासून तयारी करत असल्याचे टीव्हीएसने म्हटले आहे.