आयसीसीची रितसर घोषणा, 14 नोव्हेंबरला होणार जेतेपदाचा फैसला
दुबई / वृत्तसंस्था
कोरोनाच्या संकटामुळे भारतातून युएई व ओमानमध्ये हलवली गेलेली आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा दि. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाईल, अशी घोषणा आयसीसीने मंगळवारी केली. ही स्पर्धा भारताबाहेर होऊ शकते, असे बीसीसीआयने म्हटले होते. त्यानंतर 24 तासाच्या आतच आयसीसीने सदर घोषणा केली.
‘आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत यजमानपद भारताकडेच राहील. स्पर्धेतील सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, अबु धाबीतील शेख झाएद स्टेडियम, शारजाह स्टेडियम व ओमान क्रिकेट अकादमी ग्राऊंड येथे दि. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर यादरम्यान खेळवले जातील’, असे आयसीसीने नमूद केले.
स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील सामने ओमान व युएईमध्ये होतील. 2016 नंतर ही पहिलीच टी-20 विश्वचषक स्पर्धा असणार आहे. 5 वर्षांपूर्वी भारतातच झालेल्या या स्पर्धेत विंडीजने इंग्लंडला नमवत जेतेपद संपादन केले होते. यंदा पात्रता फेरीत बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँडस्, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान व पापुआ न्यू गिनिया यांच्यात पात्रतेसाठी लढती होतील. त्यानंतर मुख्य स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
कोटस
यंदाची आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरक्षितरित्या संपन्न होईल, यावर आमचा सर्व फोकस असणार आहे. सध्या जाहीर केलेल्या रुपरेषेनुसार, सर्व सामने यशस्वीरित्या संपन्न होतील आणि खऱया अर्थाने ते ‘सिलेब्रेशन ऑफ क्रिकेट’ असेल, याची खात्री वाटते.
-आयसीसीचे हंगामी सीईओ जॉफ ऍलार्डाईस
ही स्पर्धा भारतातच खेळवता आली असती तर अधिक आनंद झाला असता. पण, कोव्हिड-19 मुळे निर्माण झालेली अनिश्चितता व वर्ल्ड चॅम्पियनशिपचे महत्त्व यामुळे हा निर्णय घेणे भाग होते. सामने युएई व ओमानमध्ये होणार असले तरी आताही या स्पर्धेचे यजमानपद भारताकडेच असेल.
-बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली