टोकियो पॅरालिम्पिकमधील भारतीय क्रीडापटूंची कामगिरी ही सर्वाथाने ऐतिहासिक व जिद्दीचे दर्शन घडविणारी म्हटली पाहिजे. ऑलिंपिकमधील सप्तपदीनंतर त्यापेक्षाही सरस प्रदर्शन करणे, हे खरे तर पुढचे पाऊलच म्हणावे लागेल. तशी ऑलिंपिकइतकीच पॅरालिम्पिक स्पर्धाही महत्त्वाची होय. कारण, या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू हे वेगवेगळय़ा शारीरिक व्यंगांवर मात करीत आपल्यातील चिकाटी, मानसिक कणखरता, अफाट गुणवत्तेचे दर्शन घडवित असतात. टोकियोत भारतीय खेळाडूंसह जगभरातील क्रीडापटू ज्या पद्धतीने राखेतून फिनिक्स भरारी घेताना दिसत आहेत, ते सारे केवळ अचंबित करणारेच नव्हे; तर पेरणादायीही म्हणायला हवे. साधारण 1968 मध्ये भारताने पॅरालिम्पिकमध्ये सहभाग नोंदविला. यंदा जवळपास 54 जणांचे पथक या कुंभमेळय़ात सहभागी झाले असून, त्यांनी आत्तापर्यंत केलेला खेळ हा असामान्य दर्जाचाच म्हणता येतो. हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा क्रीडादिन म्हणून देशभर साजरा करण्यात येत असतो. या दिवशीच भाविना पटेल व निशाद कुमार यांनी रौप्य पदकाला गवसणी घालण्याची केलेली किमया म्हणजे हनुमानउडीच ठरते. जेमतेम वर्षाची असताना पोलिओने ग्रासल्याने भाविनाला अपंगत्व आले. त्यानंतर दृष्टीहीन मुलांना टेबल टेनिस खेळताना पाहून तिला प्रेरणा मिळाली नि त्यातूनच तिला जगण्याचा मार्ग मिळाला. त्याला रुपेरी कोंदण लाभणे, हे खरोखरच भावोत्कट. वयाच्या आठव्या वर्षी अपघातात उजवा हात गमावलेल्या निशाद कुमारने कोरोनावर मात करीत उंच उडीत घेतलेली झेपही अशीच एक नंबरी. हरियाणातील सोनिपतच्या सुमित अंतिलच्या सुवर्णफेकीचे कौतुक करावे तितके थोडेच. 2015 मध्ये एका मोटारसायकल अपघातात त्याने गुडघ्याच्या खालचा पायाचा भाग गमावला. त्यामुळे कुस्तीपटू बनायचे स्वप्न भंगले खरे. तरी त्यातूनही न डगमगता भालाफेकीत भारताचा हा शिलेदार नवा इतिहास घडवितो, हे स्वप्नवतच. एफ 64 प्रकारात 68.55 मीटर भालाफेक, हा टप्पा नक्कीच मैलाचा दगड मानता येईल. ऑलिंपिकमध्ये नीरज चोप्रा याने सुवर्णयश मिळविल्यानंतर त्याच्या पावलावर पाऊल टाकत सुमितने हे विश्वविक्रमी लक्ष्य साधणे नि देवेंद्र झांझरिया आणि सुंदरसिंग गुर्जरने अनुक्रमे रौप्य व कांस्यवर नाव कोरणे, हा पदकांचा त्रिवेणीसंगमच म्हणावा लागेल. मनगट गमावूनही निर्धाराची धार कायम ठेवली, तर माणूस काय करू शकतो, हा त्याचा खेळ हे उत्तम उदाहरण होय. झांझरिया म्हणजे झंझावाताचे दुसरे नावच. 2004 आणि 2016 मध्ये सुवर्णवेध साधणाऱया या खेळाडूचे हे विक्रमी तिसरे पदक. भालाफेकीसाठी ताकद तसेच शारीरिक व मानसिक संतुलन या दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण असतात. अशा खेळात इतके सातत्य असणे, हे दुर्मीळच होय. भविष्यात या खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी कटिबद्ध राहून युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचा या ज्येष्ठ विक्रमवीराचा मनोदय आहे. तो सिद्धीस जावो. जेणेकरून या खेळातील नव्या टॅलेंटला दिशा मिळू शकेल. नेमबाजीतील अवनी लेखराची कामगिरीही अशीच उल्लेखनीय. वास्तविक, ऑलिंपिकमध्ये भारताला नेमबाजी प्रकारात मोठय़ा आशा होत्या. प्रत्यक्षात भारतीय नेमबाजांनी निराशा केली. ही उणीव दूर करण्याचे काम कुणी केले असेल, तर ते आपल्यातील वीजिगीषू वृत्ती दाखवून देणाऱया अवनीने. 11 वर्षांची असताना एका अपघातात अवनीच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली नि व्हिलचेअरवर तिच्या जगण्याचा प्रवास सुरू झाला. आत्मविश्वास आणि निश्चित ध्येय असेल, तर कशा पद्धतीने ही वाटचाल वेगळी ठरू शकते, याचा वस्तुपाठच अवनीने घालून दिला आहे. या 19 वर्षीय खेळाडूने दहा मीटर एअर रायफलमध्ये 249.6 गुणांसह सुवर्णपदकाची कमाई केली. ऑलिंपिक पदकविजेत्या अभिनव बिंद्राच्या आत्मचरित्रातून प्रेरणा घेत मनाचा कणा मजबूत ठेवणाऱया या सुवर्णकन्येची कामगिरी सर्वांसाठी भविष्यात दिशादर्शक ठरेल. नेमबाज सिंहराज अधाना याने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक पटकावत साधलेला लक्ष्यभेदही आश्वासक. ज्या प्रतिकूल स्थितीत त्याने येथवर मजल मारली, तो प्रवास थक्क करणाराच ठरतो. थाळीफेकीत भारताच्या खात्यात रौप्यपदकाची नोंद करणाऱया योगेश कथुनिया याने अर्धांगवायूसारख्या आजारावर मात करीत मारलेली मुसंडी हीदेखील अफलातून. दुसरीकडे थाळीफेकपटू विनोद कुमार याचे कांस्यपदक काढून घेतले जाणे, हा भारतासाठी धक्का म्हणता येईल. पॅरालिम्पिकच्या नियमांमध्ये विनोद कुमार बसत नाही. त्याच्या मांसपेशी सक्षम असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्याचे सांगण्यात येते. किंबहुना, आधीच या पातळीवर कार्यवाही झाली असती, तर हा विरस टळला असता. रिओ ऑलिंपिकमध्ये भारताने चार पदके प्राप्त केली होती. या खेपेला दहा पदकांपर्यंत मजल मारणे, देशासाठी नक्कीच अभिमानास्पद म्हटले पाहिजे. कोणत्याही खेळासाठी राजाश्रय व लोकाश्रय या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. कालपरवापर्यंत केवळ क्रिकेट म्हणजेच खेळ, असा दृष्टिकोन जनमानसात दिसून येत होता. परंतु, लोकांची मानसिकता हळूहळू बदलत असल्याचे पहायला मिळते. मागच्या काही वर्षांत वेगवेगळय़ा खेळांमध्ये नवीन टॅलेंट पुढे येताना दिसते. यातील ग्रामीण भागातील खेळाडूंची कामगिरी अधिक उजवी. तरीदेखील अजून बरीच मजल गाठायची आहे. त्याकरिता पायाभूत सुविधांची उभारणी करणे, क्रीडा क्षेत्रासाठी अधिकाधिक तरतूद करणे, गुणवान खेळाडू हेरून त्यांना आवश्यक सोयी सुविधा पुरविणे, यावर भर असायला हवा. ऑलिंपिक काय किंवा पॅरालिम्पिक काय. यातून देशाची मान उंचावतेच. शिवाय संबंधित खेळाडूंच्या जीवनालाही नवी दिशा मिळते. याच खेळाडूंचे अनुभवही नवोदितांना घडविण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. म्हणूनच खेळाकडे करिअर म्हणून पाहणे व देशात स्पोर्टस् कल्चर तयार करणे, या दृष्टीने आगामी काळात पावले पडली पाहिजेत. त्यादृष्टीने टोकियोतील टेक ऑफ टर्निंग पॉईंट ठरो नि पुढच्या स्पर्धांमध्ये आणखी भरीव कामगिरी होवो, हीच अपेक्षा.
Previous Articleगोविंदा आला रे
Next Article महाबळेश्वर पोलीस स्टेशन मध्ये 56 गावांचा समावेश
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.