राज्यात लवकरच सत्ताबदल होईल ही चर्चा चालू रहायला काही ना काही विषय लागतो. सध्या पवार आणि ठाकरे यांचे नातू चर्चेचा विषय आहेत.
अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरणात काही साम्य आहे आणि आत्महत्येपूर्वी झालेल्या एका कथित पार्टीत युवा सेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचाही सहभाग होता, असे संदेश काही दिवस व्हॉट्सअपवरून पसरवले जात होते. अशा बेनामी संदेशाद्वारे आदित्य ठाकरे यांना गोवण्याची चर्चा सुरू होती. त्यातच सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीच्या विरोधात दिलेली फिर्याद आणि बिहार पोलिसांनी फिर्याद मुंबई पोलिसांकडे वर्ग न करता परस्पर तपासासाठी मुंबई गाठल्याने दोन राज्यांमध्ये निर्माण झालेला वाद गेल्या आठवडय़ात गाजला. त्यातच काही चॅनेल्सवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याने ज्ये÷ नेते शरद पवार यांनी नापसंती व्यक्त केली.
दरम्यानच्या काळात अचानकच एक नाव चर्चेत आले ते म्हणजे शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे. वैशिष्ट असे की, पार्थ यांनी सुशांत प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी हे पत्र खूप आधी दिले होते. त्यानंतर पवारांनी राममंदिर भूमिपूजनावरून पंतप्रधानांवर टीका केली होती. तर पार्थ यानी भूमिपूजनाचे स्वागत केले होते. आजोबा आणि नातू यांच्या परस्पर विरोधी भूमिका चर्चेत असतानाच आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत चर्चा उठली आणि त्याला जोडूनच पार्थ यांनी या चर्चेच्या खूप आधी केलेली सुशांत प्रकरणाच्या सीआयडी चौकशीची मागणी अचानक टीव्ही माध्यमातून गाजू लागली. पार्थ यांनीही त्या पत्राला आदित्य ठाकरे यांच्यावरील आरोपाशी जोडले जाईल असा विचार केला नसेल. पण, वादळ उठले आणि वाढवलेही! ठाकरे आणि शरद यांचे व्यक्तिगत संबंध जितके दृढ तितकाच याप्रकरणी बसणारा हादरा मोठा होता. अनुभवी शरद पवार यांनी हेच जाणून पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या वक्तव्याला आपण कवडीचीही किंमत देत नाही असे स्पष्टपणे बजावले. त्यामुळे पवार कुटुंबात ‘साहेब आणि दादा’ असे दोन प्रवाह आहेत का अशी पुन्हा चर्चा सुरू झाली. अर्थात ती होतच राहणार आहे. त्याला अलीकडच्या काळातील घडलेल्या अनेक घटना कारणीभूत आहेत. मात्र पवार इतके ठाम का बोलले हे समजायला त्यामागची पूर्वपीठिका जाणून घेणे आवश्यक आहे.
आघाडय़ांच्या सरकारमध्ये विश्वास किती घट्ट पाहिजे हे पुलोद सरकार चालविलेल्या पवारांना निश्चितच माहीत आहे. तत्कालीन इंदिरा काँग्रेसचे उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे आणि रेड्डी-चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यात निर्माण झालेला बेबनाव आणि हे सरकार पडलेच पाहिजे अशी खुद्द मुख्यमंत्री वसंतदादांची मानसिकता तयार झाल्यानंतर चपे फिरून निर्माण झालेल्या पुलोदचे शरद पवार हे मुख्यमंत्री होते. (पुलोदचे पहिले अधिवेशन आणि ठाकरे सरकारचे पहिले अधिवेशन यामध्येही साम्य आढळते) त्यामुळे पार्थ पवार यांच्या निमित्ताने त्यांनी महाविकास आघाडीमध्ये होणारा बेबनाव कठोरपणे रोखला. या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला आपला विरोध नाही हेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयात त्यावर खल सुरू आहे. मात्र या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे आणि शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांच्यावर राजकारणाचा फोकस स्थिरावला आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडी अडचणीत येत असेल तर एक प्रयत्न करून पहावा यादृष्टीने पडत्या बिहारी फळाची आज्ञा घेत सीबीआयला प्रकरण सोपवले तर शिवसेनेवर दबाव येईल आणि सेनेला आपली वाघनखे पंजात दडवावी लागतील असा भाजपचा कयास आहे. त्यादृष्टीने नारायण राणे यांना पुढे करून भाजप प्रवक्त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद राणेंच्या वक्तव्यानेच फसली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आपला खुलासाही केला. या प्रकरणात मुंबई आणि बिहार पोलीस यांचे ताणलेले संबंध, मुंबई महापालिकेने तपास अधिकाऱयाला कॉरन्टाईन करणे, तपास अधिकाऱयांनी आपल्याला नव्हे तर तपासाला कॉरन्टाईन केल्याचा आरोप करणे आणि ज्या बिहार पोलिसांची बदनामी संपूर्ण देशात आहे त्यांनी मुंबई पोलिसांवर आरोप करणे हे सर्व राजकारण प्रेरीत नाही असे म्हणता येऊ शकत नाही. त्यातच बिहारच्या पोलीस महासंचालकांनी निवडणूक लढवण्यासाठी नोकरीचा राजीनामा देऊन भाजपने तिकीट न दिल्याने पुन्हा सेवेत आल्याचा इतिहास असताना, त्यांचे आरोप महाराष्ट्रात कसे पचणार हा प्रश्नच आहे.
या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांची दोन वादग्रस्त पत्रे वादास कारण ठरली. पुन्हा एकदा प्रश्न शरद पवारांच्या विश्वासार्हतेचा निर्माण झाला. अर्थात त्यामुळे अजितदादा कुटुंब नाराज झाले आहे. दादांची जुनी नाराजी आणि पार्थचे नवे प्रकरण यामुळे पवारांसमोर हे एक नवे आव्हान उभे आहे. तर ठाकरे परिवाराच्या वारसाला पदार्पणातच मोठय़ा दिव्यातून जावे लागण्याची शक्मयता आहे. अशा काळात पवार काय करतील? हे त्यांच्या पूर्वेतिहासावरून शोधायचे झाले तर पुलोदच्या प्रयोगासाठी त्यांनी इंदिरा गांधींनी संजय गांधींचे नेतृत्व मान्य करून केंद्रात येण्याचा प्रस्ताव ठोकरून राज्यातील आपल्या सरकारला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवत बरखास्ती ओढवून घेतली होती. तर दादांना उपमुख्यमंत्री, सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपदाचा मोदींचा प्रस्ताव नाकारून ठाकरे यांना मुख्यमंत्री केले होते. या इतिहासाभोवतीच हे प्रकरण पिंगा घालत आहे. ठाकरे आणि पवार यांचे नातू केवळ फोकसमध्ये नव्हे तर त्यांचे आणि राष्ट्रीय राजकारणात महत्त्व असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादीसह प्रादेशिक पक्षांच्या एकजुटीच्या प्रयोगाचे भवितव्यही याप्रकरणातून स्पष्ट होणार आहे.
शिवराज काटकर