मोदी सरकारच्या दुसऱया कार्यकाळाची वर्षपूर्ती : 1 हजाराहून अधिक ऑनलाईन कॉन्फरन्स
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱया कार्यकाळाचा पहिला वर्षपूर्ती सोहळा भाजप डिजिटल माध्यमातून साजरा करणार आहे. सरकारची कामगिरी मांडण्यासाठी देशभरात व्हर्च्युअल रॅली आणि पत्रकार परिषदांचे आयोजन केले जाणार आहे. कोरोना महामारीमुळे कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मोदींनी मागील वर्षी 30 मे रोजी दुसऱयांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. वर्षपूर्तीचा कार्यक्रम 30 मेपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
सर्व मोठय़ा राज्यांच्या शाखांनी किमान 2 तर छोटय़ा राज्यांच्या शाखांनी किमान 1 व्हर्च्युअल रॅली आयोजित करावी. प्रत्येक रॅलीत किमान 750 लोक सामील असावेत. देशभरात 1 हजारपेक्षा अधिक ऑनलाईन परिषदांचे आयोजन करण्यात यावे असा निर्देश पक्षाचे महासचिव अरुण सिंग यांनी प्रदेश भाजप तसेच भाजप कार्यकर्त्यांना पत्राद्वारे दिला आहे.
150 पेक्षा अधिक नेते सामील
केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह एकूण 150 पेक्षा अधिक जण सभांना संबोधित करणार आहेत. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा फेसबुक लाइव्हने भाषण करणार आहेत. या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगची पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे.
कोरोना उपाययोजना मांडणार
केंद्र सरकार आत्मनिर्भरतेवर भर देत असल्याने पक्षांच्या कार्यकर्त्यांना स्वदेशी अंगिकारण्याचा संकल्प घेण्यास सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून कोरोना संकट रोखण्यासाठी केले जाणारे प्रयत्न जनतेपर्यंत पोहोचविण्याची सूचनाही कार्यकर्त्यांना करण्यात आली आहे.
महिनाभर चालणार भाजपचा सोहळा
हा सोहळा 30 मेपासून सुरू होत महिनाभर चालणार असल्याचे समजते. मोदी सरकारच्या दुसऱया कार्यकाळातील पहिले वर्षे ऐतिहासिक कामगिरीसाठी ओळखले जाणार आहे. यात कलम 370 हद्दपार करणे, तिहेरी तलाकविरोधी कायदा लागू करणे इत्यादी निर्णयांचा समावेश आहे. याच वर्षभरात अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारची ही कामगिरी इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाणार असल्याचे भाजपने म्हटले आहे.