डांटे या कवीबद्दल आज आवर्जून लिहावे असे वाटते. तेराव्या शतकात इटलीमध्ये डांटे हा कवी होऊन गेला. डांटे नुसताच पावसाच्या किंवा प्रेमाच्या कविता लिहिणारा कवी नव्हता. त्याला राजकीय भूमिका होती आणि ती तो परखडपणे मांडू शके. पण तो राजकीय विचारवंत असला आणि त्याला राजकीय भूमिका असली तरी त्याच्या कविता चारोळय़ांसारख्या किंवा वात्रटिकासदृश नव्हत्या. ते असो.
त्याच्या राजकीय भूमिकेमुळे आयुष्याच्या शेवटच्या नऊ वर्षाच्या काळात त्याला घरदार सोडून परागंदा व्हायची वेळ आली. फ्लोरेंस इथे त्याचे मलेरियामुळे निधन झाले. पण मरणापूर्वी या परागंदा होण्याच्या कालखंडात त्याने डिव्हाईन कॉमेडी नावाचे महाकाव्य रचले. यात स्वतःलाच त्याने नायकाच्या भूमिकेत ठेवले होते. नायकाच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याचा (तत्कालीन धार्मिक कल्पनानुसार) प्रवास यात चित्रित केला आहे. सर्वात आधी हा आत्मा नरकातून प्रवास करतो. तिथे त्याला शिक्षा भोगत असलेले जीव आढळतात.
शिक्षा भोगणाऱया या जिवांमध्ये जादूगार, किमयागार, बुवाबाजी करणारे आणि ज्योतिषी सामील आहेत. जादू करणे, स्वतःला देवाचा दूत घोषित करणे आणि भविष्य पाहून ते लोकांना सांगणे या गोष्टी देवांना आवडत नाहीत. म्हणून त्यांना देवाने अजब शिक्षा केलेली असते. देवाने माणसाला समोर बघण्याची दृष्टी दिली आहे. असे असताना आपली मर्यादा ओलांडून जे भविष्याकडे बघतात त्यांच्यावर देव रुष्ट होतो ही प्रचलित कल्पना डांटेने मांडली आहे. या ज्योतिष्यांना देवाने काय शिक्षा दिलेली असते, तर त्यांच्या माना कायमच्या नव्वद अंशात वळवून ठेवल्या आहेत. त्यामुळे त्यांना मागचे दिसते. पण पुढचे आणि समोरचे दिसत नाही. या अवस्थेत त्यांना अनंत काळ उफराटी वाटचाल करावी लागणार आहे. त्यांना स्वर्गात प्रवेश कधीच मिळणार नाही.
आठशे वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या डिव्हाईन कॉमेडी या महाकाव्याचे आजही अनेक भाषात अनुवाद होत असतात.
हे सगळे वाचून मनात आले, ज्योतिष आणि भविष्यकथन याबाबत आपल्या पूर्वजांना काय वाटत असेल? ग्रंथालयात शोध घेतला तेव्हा सव्वाशे वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली चिंतामण मोरेश्वर आपटे यांची ‘श्यामभट्ट’ ही पाचशे पानी कादंबरी सापडली. न्या. रानडे यांची हिला प्रस्तावना लाभली आहे. कथाकार दि. बा. मोकाशी सतत वाचकांपुढे हिची शिफारस करीत. हिच्याबद्दल उद्या सांगतो.