मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली आज बैठक : आतापर्यंत 117 महाविद्यालयीन विद्यार्थी पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात पदवी महाविद्यालये सुरू झाल्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे डिसेंबरमध्येही शाळा-महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून बंद असलेल्या शाळा-महाविद्यालयांपैकी 17 नोव्हेंबरपासून पदवी महाविद्यालये सुरू झाली आहेत. महाविद्यालयात येणाऱया प्रत्येक विद्यार्थ्याची कोरोना चाचणी केली जात आहे. आतापर्यंत 26,205 विद्यार्थ्यांची चाचणी केली असून यापैकी 117 विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 5,378 प्राध्यापकांपैकी 51 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. शिक्षक आणि कर्मचाऱयांसह आतापर्यंत 38,653 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 8 महिन्यांपासून बंद असलेली शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबत सोमवारी राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार आहे. विधानसौधमध्ये सोमवारी दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली शिक्षण खात्याचे मंत्री आणि अधिकाऱयांची बैठक होणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री सुरेशकुमार, खात्याचे प्रधान कार्यदर्शी, आयुक्त, पदवीपूर्व शिक्षण खात्याचे सचिव यावेळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, शाळा सुरू करण्याबाबत चर्चा होणार असून निर्णय जाहीर केला जाणार आहे.
निर्णय जाहीर न झाल्यास सर्वपक्षीय नेत्यांची बैठक
एखाद्यावेळेस सोमवारच्या बैठकीत शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय जाहीर न झाल्यास मुख्यमंत्री सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेऊन मत जाणून घेऊन निर्णय जाहीर करण्याचीही शक्यता आहे. एखाद्यावेळेस शाळा-महाविद्यालये सुरू केल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्यास पालक सरकारला लक्ष्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही पालकांनी शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास विरोध व्यक्त केला आहे. तर काहींनी शाळा सुरू करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱया बैठकीत सर्वांचे मत जाणून घेऊन साधक-बाधक चर्चा केल्यानंतर सरकार अंतिम निर्णय जाहीर करणार आहे. यापूर्वी शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनीही शाळा विकास समिती, पालक, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा सार्वजनिक शिक्षण खात्याचे उपसचिव यांच्यासह खासदार, आमदारांची मते जाणून घेऊन सरकारकडे अहवाल सादर केला आहे.
यापूर्वीच पदवी महाविद्यालये, वैद्यकीय, अभियांत्रिकी, दंत वैद्यकीय, डिप्लोमा महाविद्यालये गेल्या आठवडय़ापासूनच सुरू झाली आहे. आता शाळा सुरू कराव्यात की ऑनलाईन शिक्षण व्यवस्थाच काही कालावधीसाठी सुरू ठेवावी याबाबत सरकार निर्णय घेणार आहे. सूत्रांनुसार सध्या आठवी ते बारावीपर्यंत शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करीत आहे. यापूर्वीच पदवी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीतही शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबत राज्य सरकार गंभीरपणे विचार करीत आहे.