ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू-काश्मीरमधील नगरोटा येथील बान टोल नाक्याजवळ ट्रकमधून आलेल्या दहशतवाद्यांमध्ये व जवानांमध्ये जोरदार चकमक झाली. ज्यामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्यांकडून हस्तगत करण्यात आलेल्या मोठ्याप्रमाणावरील शस्त्रसाठा पाहता, आगामी काळात जम्मू-काश्मीरमधील डीडीसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा त्यांचा कट असण्याची शक्यता होती, असे जम्मू झोनचे आयजी मुकेश सिंह यांनी म्हटले आहे.
टोल नाक्यावर झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुकेश सिंह म्हणाले की, दहशतवाद्यांकडून 11 एके-47 रायफल, तीन पिस्तुलं, 29 ग्रेनेड, पिट्टू बॅग, कंपस, मोबाईलसह अन्य सामुग्री हस्तगत करण्यात आली. मात्र, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
पुढे ते म्हणाले, मागील काही दिवसांत जेव्हापासून डीडीसी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. तेव्हापासून आम्हाला गुप्तचर विभागाकडून माहित येत होती की, निवडणूक काळात काही दहशतवादी कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसेच, दहशतवादी एक ठराविक लक्ष्य निश्चित करून, मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा घेऊन घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. या पार्श्वभूमीवर व मागील काही ज्या दहशतवादी घटना घडल्या आहेत हे पाहता. आम्ही सर्व नाक्यांना सतर्क केले होते. तसेच, सर्व नाक्यांवर कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.
दरम्यान, आज पहाटे 5 वाजता जेव्हा वाहनांची नियमीत तपासणी सुरू होती. तेव्हा एका ट्रकला अडवण्याता आले. यानंतर ट्रक चालकास खाली उतरवले गेले तर तो तिथून फरार झाला. यानंतर ट्रकची तपासणी सुरू असताना, पोलीस व सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. जवळपास 3 तास जोरदार चकमक सुरू होती. ज्यामध्ये दोन पोलीस शिपाई जखमी झाले. तर, यावेळी जवानांनी चार दहशतवाद्यांना ठार केले.