कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे समाजात आधीच भीतीचे वातावरण पसरलेले असताना पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू डोके वर काढू शकतो, अशी शंका तज्ञांनी व्यक्त केली आहे. यावेळी डेंग्यूबाबत मागील वेळेपेक्षा अधिक सतर्क राहण्याची गरज आहे, असा इशारा या क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी दिला आहे. डेंग्यूच्या प्रकोपामुळे कोरोनाचे संकटही वाढू शकते आणि असे झालेच तर परिस्थिती हाताळणे अत्यंत जटिल होऊन जाईल, अशा शब्दांत या शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे.
आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, आपल्या देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आठ लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे. डेंग्यूच्या आजवरच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी डेंग्यूचे दीड लाख रुग्ण आपल्या देशात आढळून येतात. गेल्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये 1 लाख 35 हजार डेंग्यूचे रुग्ण आढळले होते आणि त्यातील 132 जणांना जीव गमवावा लागला होता.
निम्मे वर्ष उलटून गेले तरी मानवी जीवनावरील संकटाचे ढग दूर होईनासे झाले आहेत. या संकटामुळे मानवाला आपला जीव वाचविण्यासाठीच मुळात अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. तशातच डेंग्यूबाबतचा इशारा देण्यात आला आहे.
- वस्तुतः डेंग्यू आणि कोरोनाची लक्षणे जवळजवळ एकसारखीच आहेत.
- यातील प्रमुख म्हणजे दोन्ही आजारांची लागण झाल्यास लोकांना डोकेदुखी आणि अंगदुखी जाणवते. तसेच तीव्र ताप येतो.
- डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांना कोरोनाही आपल्या कवेत सहजपणे ओढून घेऊ शकतो. जर दोन्ही आजारांनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढली तर मृत्युमुखी पडणार्यांच्या संख्येतही झपाटय़ाने वाढ होत जाईल आणि स्थिती भयावह बनेल.
- डेंग्यूचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण खूपच चांगले आहे; परंतु कोरोना काळात डेंग्यूचे रुग्ण वाढल्यास अशा रुग्णांना कोरोनाचीही लागण होण्याची शक्यता दाट आहे. शासन आणि प्रशासनाची धास्ती त्यामुळे आतापासूनच वाढू लागली आहे
- अशा प्रकारे एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे हा आजार अत्यंत वेगाने वाढत जातो. ही साखळी तोडणे सोपे नसते.
- डेंग्यूचे वर्गीकरण तीन प्रकारांत केले जाते. सामान्य ताप हा पहिला वर्ग आहे. हॅमरेजिक ताप हा दुसरा वर्ग असून, तिसरा वर्ग अत्यंत घातक आहे. तो म्हणजे शॉक सिंड्रोम. तीव्र ताप, स्नायूंमध्ये वेदना, अशक्तपणा आणि घसादुखी अशी लक्षणे दिसू लागताच रुग्ण जवळच्या डॉक्टरांकडून उपचार घेऊ शकतो. परंतु जेव्हा शरीराच्या एखाद्या अवयवातून रक्तस्राव होऊ लागतो आणि व्यक्ती वारंवार बेशुद्ध होऊ लागते तेव्हा तातडीने तज्ञांकडून उपचार घेणे आणि रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असते.
- पावसाळ्याच्या काळात डेंग्यूच्या डासांची वाढ होण्यास सुरुवात होते आणि जुलैपासून ऑक्टोबरपर्यंत डेंग्यूचे विषाणू अधिक प्रभावी असतात. या काळात सर्वच प्रकारच्या डासांची संख्या वाढत असते.
- डेंग्यूचा डास कमी उंचीपर्यंत उडणारा असतो आणि सामान्यतः सकाळच्या वेळी दंश करतो. डेंग्यूची लागण झाल्यास बचावाचे अनेक मार्ग आहेत; परंतु कोरोनाच्या संसर्गकाळात जर डेंग्यू झाला तर रुग्णाची स्थिती गंभीर बनू शकते. जर आपण थोडी मेहनत आधीच घेतली तर या गंभीर धोक्यापासून स्वतःला दूर ठेवू शकतो. तसे पाहिले असता, सर्व प्रकारच्या आजारांपासून बचावाचा स्वच्छता हाच एक सोपा मार्ग आहे. परंतु ही स्वच्छता सध्याच्या काळात थोडी अधिक बाळगली तर खूपच फायदा होऊ शकतो.
- आपले घर स्वच्छ राखणे आवश्यक आहेच; परंतु त्याचबरोबर आपला परिसर स्वच्छ राखणे, कचरा आणि पाणी जमा होऊ न देणे अशी अतिरिक्त काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे.
- कूलरसारख्या उपकरणांमध्ये पाणी साचून राहते. अशा सर्व जागा झाकून ठेवणे किंवा त्यावर थोडे रॉकेल शिंपडणे आवश्यक आहे.
- वस्तुतः आपल्या देशातील सर्वांत मोठी समस्या अशी आहे की, असे एखादे संकट आपल्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही, अशी अनेकांना उगीचच खात्री असते. परंतु असा विचार करणारा स्वतःच जेव्हा आजाराच्या विळख्यात सापडतो, तेव्हा पश्चात्तापाव्यतिरिक्त हातात काहीच उरत नाही.
- कोरोनामुळे आलेल्या संकटातून आपण एक धडा जरूर घेतला पाहिजे. कोरोनाचा विषाणू आपल्याकडे येऊन सुमारे चार महिने उलटले आहेत आणि त्याच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण बरीच काळजी घेत आहोत. जर आपण इतर आजारांपासून बचावासाठी अशीच काळजी घेतली तर आपण निश्चितपणे या लढय़ात यशस्वी होऊ शकतो.
- डेंग्यू, मलेरिया किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या आजाराकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. या आजारांना कमी लेखल्यास त्याची किंमत आपल्याला प्राणाचे मोल देऊन चुकवावी लागू शकते. एखादे संकट येत आहे, याची चाहूल आपल्याला जर आधीच लागू शकते, तर त्यापासून बचावासाठी तयारीही आपण केली पाहिजे.
- डेंग्यूशी लढण्याची हीच योग्य वेळ आहे. स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षितता कायम राहावी म्हणून अतिरिक्त जागरूकता बाळगण्याची गरज आहे. कारण यावर्षी आपले आयुष्य ‘सावधानी हटी, दुर्घटना घटी’ या मार्गानेच चालले आहे.
डॉ. संजय गायकवाड