‘युगानुयुगे’ ‘वेब’ व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन : बहुजन संघटन चॅनेलतर्फे आयोजन : बाबासाहेबांचे विचार सर्वांसाठीच प्रेरक! : बाबासाहेबांना जातीत बांधता येणार नाही!
कणकवली:
घटनातज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील मोजक्याच विचारवंतांपैकी आहेत. त्यांनी जाती निर्मूलनाचे आणि शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी दिलेले विचार हे समग्र मानवाला मुक्तीच्या दिशेने घेऊन जाणारे आहेत. त्यामुळे त्यांना एकाच जातीत बांधता येत नाही. ‘युगानुयुगे तूच’ या त्यांच्यावरील दीर्घ कवितेची निर्मिती करताना मला याचा प्रत्यय आला. बाबासाहेबांनी केलेले काम हे जग असेपर्यंत राहणार आहेच. परंतु, सर्व जाती-धर्मातील नागरिकांसाठी त्यांचे विचार प्रेरक आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी बहुजन संघटन चॅनेलतर्फे आयोजित केलेल्या ‘वेब’ व्याख्यानात केले.
व्याख्यानात कांडर यांनी ‘युगानुयुगे तूच’ या दीर्घ कवितेची निर्मितीप्रक्रिया तसेच बाबासाहेबांचे विचार आणि कार्य यासंदर्भातील अनोखे पैलू उलगडून दाखविले. यावेळी व्याख्यानाचे स्थानिक संयोजक प्रा. डॉ. सोमनाथ कदम, प्रा. प्रदीप वळवी उपस्थित होते.
‘युगानुयुगे तूच’मध्ये वेगळा आशय!
कांडर म्हणाले, कोणत्याही कवितेची निर्मिती करताना कविता सूचली आणि लिहिली, हे प्रथमदर्शनी खरे असले तरी, तेवढय़ापुरतीच कविता लिहिण्याची प्रक्रिया थांबत नाही. तर कवीची आधीची सर्व जडणघडण आणि मानसिकता त्या कवितेच्या निर्मितीला जोडलेली असते. बाबासाहेबांवरील ‘युगानुयुगे तूच’ ही दीर्घ कविता लिहिताना याचा मला पुन:प्रत्यय आला. छोटी कविता लिहिताना जो त्रास सहन करावा लागत नाही, त्यापेक्षा कित्येक पटीचा त्रास दीर्घ कविता लिहिताना सहन करावा लागतो. कवीची दमछाक होते. बाबासाहेबांवरील ही कविता लिहिताना आजवर मराठीत बाबासाहेबांवर लिहिल्या गेलेल्या कवितांपेक्षा या कवितेचा आशय वेगळा आणि अधिक सोपा, सर्वसामान्य वाचकाला कसा कळेल, याबाबत चिंतन करण्यात आले होते. कवी कविता लिहितो, म्हणजे तो एक राजकारणच खेळत असतो. हे राजकारण समाजाच्या हितासाठी असते. बाबासाहेबांवरील ही कविता म्हणजे आजच्या जाती-धर्मात अडकलेल्या राजकारणाविरोधातील एक दीर्घ विधानच आहे. दुर्दैवाने कवीने राजकारण आपल्या कवितेतून खेळायचे असते आणि ते वाचकांनी समजून घ्यायचे असते. तेवढी समज अजून काही कवींमध्ये आणि वाचकांमध्येही वाढत गेलेली नाही.
बाबासाहेब एका विशिष्ठ समाजाचे नाहीत!
बाबासाहेबांनी चवदार तळय़ाचा जो संघर्ष केला आणि त्यातून चवदार तळे दलितांना पाण्यासाठी मुक्त केले, ती अस्मिता पाण्यासाठी संघर्ष करणाऱया सर्वांची आहे. त्यामुळे जोपर्यंत या जगात माणूस आहे, तोपर्यंत तहान असणारच आहे. तर जोपर्यंत तहान आहे, तोपर्यंत या जगात बाबासाहेबांचा विचार असणारच आहे. दुर्दैवाने बाबासाहेब हे ‘एका विशिष्ट समाजाचे’ असे चित्र निर्माण करण्यात आले, हे वाईट असून यामागे सर्व जातींमधील वर्ग जबाबदार आहेत. अलिकडल्या काळात तर प्रत्येक जातीने आपापल्या जातींचे महापुरुष वाटून घेतले आहेत. पण, यापुढील काळात बाबासाहेबांना असे जातीत बांधता येणार नाही. त्याचे कारण, संविधानालाच धोका पोहोचविण्याचे काम काही राजकीय संघटना करत आहेत. अशावेळी संविधान टिकले, तर या देशाची लोकशाही टिकेल. लोकशाही टिकली, तरच प्रत्येक माणसाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकेल. त्यामुळे प्रत्येक माणसाला बाबासाहेबांचे विचार अंमलात आणण्याशिवाय गत्यंतर नाही.
संविधानात बदल केल्यास लोकशाहीला धोका!
संविधानात बदल केल्यावर लोकशाहीला धोका पोहोचणार, हे खरेच आहे. परंतु, जाती-धर्माच्या आधारावर दुफळी माजविण्यासाठी बॉम्बस्फोट, धार्मिक दंगली अशा गोष्टी केल्या जात आहेत. अलिकडल्या काळात राष्ट्रवाद नावाची गोष्ट पुन्हा-पुन्हा सांगताना ‘एक जात-एक धर्म’ आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला जात आहे. गेल्या दहा वर्षांत सत्ताधारी राजकीय व्यवस्था जाती-धर्माचे समर्थन करूनच सत्तेवर येत आहेत. सत्तेवर आल्यावर जाती-धर्माच्या गटांना प्रोत्साहन मिळावे, अशा घटना घडवित आहेत. अशावेळी संविधान सांभाळणे या देशाचा सच्चा नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. यासाठी बाबासाहेबांचा विचार सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याशिवाय गत्यंतर नसल्यानेच त्यांच्यावरील ‘युगानुयुगे तूच’सारख्या दीर्घ कवितेची मला निर्मिती करावी लागली, असेही कांडर म्हणाले.