ऑनलाईन टीम / मुंबई :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवस्थान असलेल्या रजगृहाची मंगळवारी दोन माथेफिरुंनी तोडफोड केल्याची घटना घडली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली असून कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
दोन माथेफिरुंनी मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार केल्याचा आरोप आहे. त्यांनी घराबाहेरील सीसीटीव्हीचेही मोठे नुकसान केले. पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.
पोलिसांनी तत्परतेने तपास सुरु केला असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
दरम्यान, राज्यातील सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी. ‘राजगृह’ आपल्या सर्वांसाठी आदराचे ठिकाण आहे. माझे आपल्या सर्वांना आवाहन आहे की, आपण शांतता राखावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.