घोडे उधळून तबेला सोडेपर्यंत काँग्रेस वाट पाहणार आहे काय असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार आणि ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी ट्विटरद्वारे केला आहे. राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ पक्षातून स्पष्टपणे उठलेला हा एकमेव आवाज ठरावा. हा आवाज पायलट यांच्या बाजूने आहे की, गांधी घराण्याच्या विरोधात, याबद्दल मतमतांतरे असली तरीही राजस्थानातील चालू घडामोडींमुळे पुन्हा एकदा गांधी घराण्याचे या पक्षावरील वर्चस्व आणि पक्षातील दुढ्ढाचार्यांचा वरचष्मा याची चर्चा सुरू झाली आहे. अर्थात हा मजकूर लिहिला जात असताना पेल्यातील वादळ तात्पुरते शमले असल्याचे स्पष्ट झाले होते. जवळपास शंभर आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर विश्वास व्यक्त केला होता आणि आता पक्षाचे नेते सचिन पायलट यांची नाराजी दूर करतील असे स्पष्ट करण्यात आले होते. पक्षातील ज्येष्ठांनी पुन्हा एकदा तरुण रक्तावर मात केल्याचेच हे चिन्ह होते. अनुभवी नेते नवख्या पोरांसमोर झुकणार नाहीत आणि त्यांच्या आड लपून सत्ता अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाहीत असाच जणू त्यांच्या हास् याचा संदेश होता. त्यादृष्टीने विचार केला तर, कपिल सिब्बल यांनी घोडे, तबेला यांची दिलेली उपमा योग्यच ठरावी! पक्षाचा जेव्हा तबेला होतो तेव्हा याहून वेगळे काय होणार? ज्यांच्याबद्दल देशभर कौतुकाचे वातावरण आहे असे काँग्रेसमधील एक युवक ज्योतिरादित्य शिंदे यांनी यापूर्वीच पक्षाला रामराम ठोकला आणि मध्य प्रदेशची सत्ता काँग्रेसच्या हातून सुटली. राज्य भाजपमय झाले. आता तीच वेळ सचिन पायलट यांच्यावर आली होती आणि आपल्यामागे 30 आमदार आहेत आणि राज्यातील सत्ता अल्पमतात आली आहे असे त्यांनी स्पष्ट केले होते. गेहलोत सरकारने आपल्याच उपमुख्यमंत्र्याला पोलिसांकडून सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नाबद्दल नोटीस बजावण्यात आल्यानंतर हा संताप पायलट यांनी व्यक्त करून दिल्ली गाठली होती. एका अर्थाने त्यांचे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी खेळलेली ही खेळीच होती. पक्ष सरचिटणीस वेणुगोपाल यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली, सिब्बल यांनी पायलट यांच्या बाजूने मत व्यक्त केले किंवा प्रियांका गांधी यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला हा त्यातल्या त्यात काँग्रेसमधील तरुणांना दिलासा ठरावा. मात्र तरीही या ‘तबेल्या’त आपले स्थान काय हा प्रश्न त्यांच्या मनात कायम राहणार हे निश्चित आहे. सिब्बल यांनी या तरुणांना निदान घोडे तरी मानले. इतर नेत्यांच्या मते ते अजूनही ‘शिंगरु’च आहेत. वयाची पन्नाशी गाठली तरीही ते मुख्यमंत्री होण्यास ‘पात्र’ ठरू शकत नाहीत! अनुभवी व्यक्तींनाच प्राधान्य हवे या आग्रहाने काँग्रेसने राहुल-प्रियांका गांधींनाही हतबल केले. ऐन लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ किंवा मादवान घोडय़ांनी तरुण-बहुरंगी ‘अबलक’ घोडय़ांना महत्त्वही दिले नाही आणि त्यांना जुमानलेही नाही. लोकसभा निवडणुकीचा पराभवही त्यांच्याच पाठीवर कसा लादला जाईल हेच पाहिले. इतर तरुण नेत्यांना राज्याच्या निवडणुकीत फिरवले पण पायात पायबंद घालूनच! राजस्थान, मध्य प्रदेशात तरुण नेत्यांना उपमुख्यमंत्री केले. पण, त्यांचा लगाम अशोक गेहलोत आणि कमलनाथ यांच्या हातात ठेवला. सत्तेच्या खोगीरावर गादी म्हणजेच गाशा घालायला या तरुण नेत्यांनाच कामाला लावले आणि त्या गाशावर चाबूकस्वार म्हणून ज्येष्ठ नेत्यांना बसवले. त्यांनी घोडय़ावर बसून तरुण नेत्यांना ‘शिस्त’ लावायचे काम केले….! थोडक्यात पक्षात वशिल्याच्या तट्टूंना महत्त्व आहे, तुमचे तिथे काम नाही असा संदेशच दिला गेला. इतके सगळे केल्यानंतर जर ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड केले तर त्यांना गद्दार ठरविले गेले. अर्थात त्यांचे बंड यशस्वी झाले, भाजपमध्ये गेलेले त्यांचे आमदार मंत्री झाले म्हणून त्यांची गणना यशस्वितांमध्ये झाली. सचिन पायलट यांच्या बाबतीत मात्र ते घडू शकले नाही. तीस आमदार त्यांच्या बाजूने राहिले तरी राजस्थानची सत्ता अबाधित राहू शकते असे चित्र त्या नेत्यांनी निर्माण केले. तीसमधील काही आमदारही गडबडले तेव्हा आपण भाजपमध्ये जाणार नाही असा खुलासा पायलट यांनी केला. तेव्हाच त्यांच्याबाबतीत काय घडणार हे स्पष्ट झाले होते. पण, या दरम्यान काँग्रेस नेत्यांनी किंवा गेहलोत यांनी भाजपच्या आमदार खरेदीला बराच दोष दिला. अर्थात तो चुकीचाही नव्हता. भाजपवाले ही संधी साधायच्या प्रयत्नात होतेच. परिणामी ईडी, सीबीआय आणि आयकरला केंद्रीय सत्तेने राजस्थानच्या घोडामैदानात उतरवले होतेच. काँग्रेस आणि भाजपमधील हा सत्तेचा खेळ नवा नाही. दोन्ही पक्षांकडे असलेली राज्ये त्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांभाळता येत नाहीत हे कोरोनाच्या काळात स्पष्ट झालेले आहे. पण, तरीही त्यांना दुसऱयाच्या ताब्यातील राज्य हस्तगत करण्यात खूप रूची आहे. आपल्या गव्हाणीत काय टाकले आहे यापेक्षा दुसऱयाच्या समोर काय वाढले आहे हे पाहण्याची दोन्ही पक्षांना भारीच हौस. आता ज्यांना राजस्थानमध्ये भाजप सत्ता पटकवायला टपली आहे असे वाटते त्यांनी हरियाणामध्ये काँग्रेससुद्धा भाजपची सत्ता उलथवायला नुकतीच टपली होती हे विसरता येणार नाही. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना न जुमानणारे दुष्यंत चौटाला यांच्यामुळे वैतागलेल्या आमदारांशी काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी ‘गुफ्तगु’ चालवली होती. हे सरकार पडणार तोच एका अपक्षातील मंत्री झालेल्या नेत्याने त्याचा भांडाफोड केला आणि मोदी-शहा जोडीने प्रचंड प्रयत्न करून हरियाणाची सत्ता वाचवली. कोरोनाच्या संकट काळातच हे राजकारण सुद्धा चालू होते. त्यामुळे सत्तालालसेचा आरोप भाजप आणि काँग्रेस दोघांनीही एकमेकावर करण्यात अर्थ नाही. लोकशाही जिंकली असे म्हणणारे दोन्ही बाजूला आहेत, दोघांनीही पक्षाचे रूपांतर तबेल्यात केले आहे. वशिल्याचे तट्टूच मुख्यमंत्रीपदी आहेत आणि जनतेत स्थान असणारे नेते विजनवासात आहेत…!
Previous Articleवळीवडेत कोरोना रुग्णांची संख्या तेरा
Next Article दिल्लीच्या 15 टक्के लोकसंख्येत कोरोनाचा फैलाव
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.