इस्लाम अथवा ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱयांना दणका- कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशभरात अनेक राज्यांमध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असतानाच आता दलित आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अनुसूचित जातीतील व्यक्तींनी धर्मपरिवर्तन करून इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये प्रवेश केल्यास, ते आरक्षित जागेवरून निवडणूक लढवू शकणार नाहीत. तसेच असे लोक अनुसूचित जातीसाठी मिळणाऱया आरक्षणाचाही फायदा उठवू शकणार नाहीत, असे कायदामंत्र्यांनी म्हटले आहे.
सभागृहात भाजप खासदार जीबीएल नरसिंह राव यांनी ‘आरक्षित निवडणूक क्षेत्राची पात्रता’ यावर प्रश्न विचारला होता. त्यावर केंद्रीय कायदा मंत्र्यांनी उत्तर दिले. ‘ज्या लोकांनी हिंदू, शीख आणि बौद्ध धर्म स्वीकारला आहे ते अनुसुचित जातींसाठी आरक्षित असलेल्या जागांवरुन निवडणुका लढवू शकतात. याव्यतिरिक्त या धर्माचा स्वीकार करणाऱया लोकांनाही आरक्षणाचा लाभ मिळेल,’ असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. सरकार लोकप्रतिनिधीत्व कायदा आणि निवडणुकीच्या नियमांमध्ये काही दुरूस्ती करण्याचा विचार करत आहे का, ज्यात स्पष्टपणे ख्रिस्ती आणि इस्लाम हा धर्म स्वीकारणाऱयांना दलित आरक्षित जागांवरुन निवडणूक लढण्यासाठी पात्र नसतील, असा सवाल जीव्हीएल नरसिंह राव यांनी सरकारला विचारला. यावर उत्तर देताना अशाप्रकारचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचेही स्पष्ट केले.
संविधानामध्ये अनुसूचित जातीबद्दल पॅरा-3 ही विविध राज्यातील अनुसूचित जातीतील यादी सांगते. या अंतर्गत एखादा व्यक्ती हिंदू, शीख आणि बौद्ध धर्म व्यतिरिक्त धर्म मानत असेल आणि तो अनुसूचित जातीचा सदस्य असेल तर त्याला अनुसूचित जातीच्या सदस्य मानला जाणार नाही. अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र असणारी कोणतीही व्यक्ती आरक्षित जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी पात्र आहे, असेही रविशंकर प्रसाद यावेळी म्हणाले.