किरण ठाकुर यांचा विश्वास : पुण्यात सहकार महापरिषदेत मांडली ’लोकमान्य’ची यशोगाथा
प्रतिनिधी /पुणे
सहकार वाढविण्यासाठी सहकारी संस्थांवरील निर्बंध हटविल्यास त्या अन्य बँकांपेक्षा आर्थिकदृष्टय़ा अधिक मजबूत होतील, असा विश्वास लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी रविवारी येथे व्यक्त केला. सहकार वृद्धीतूनच खरा समाजवाद वाढेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. ‘लोकमान्य’ प्रस्तुत व ‘सकाळ माध्यम समूहा’च्यावतीने आयोजित सहकार महापरिषदेत ते बोलत होते.
किरण ठाकुर म्हणाले, राज्यातील सहकार वाढविण्यासाठी विठ्ठलराव विखे-पाटील, तात्यासाहेब कोरे, शंकरराव मोहिते-पाटील, वैकुंठभाई मेहता, धनंजयराव गाडगीळ आणि वसंतदादा पाटील या दिग्गज नेत्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या मेहनत आणि प्रयत्नांमुळेच राज्यात आजही सहकार चळवळ टिकून आहे. राज्यात समाजवाद आणायचा असेल तर सहकार वाढवणे हाच एकमेव मार्ग आहे, असे त्यांनी सांगितले.
सहकाराला बदनाम करण्याचा डाव यशस्वी होता कामा नये
लोकमान्य सोसायटीची यशोगाथा सांगताना ते म्हणाले, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळविणारच,’ ही घोषणा लोकमान्य टिळकांनी बेळगावात ‘ठळकवाडी’ येथे केली. पुढे आम्ही त्याचे नामांतर ‘टिळकवाडी’ केले. याच टिळकवाडीत लोकमान्य मल्टिपर्पजची स्थापना 1995 ला केली. लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेमुळेच आम्ही या नागरी सोसायटीला ‘लोकमान्य’ हे नाव दिले. माझे वडील बाबुराव ठाकुर हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते.
लोकमान्य टिळक यांच्या हयातीत देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही. पण, त्यांनी स्वराज्य, स्वदेशी ही चळवळ सुरू केली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्य घडवू, असे टिळक सांगायचे. हा विचार घेऊनच आम्ही ‘लोकमान्य’ची मुहूर्तमेढ रोवली. ज्यावेळी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये संगणक नसायचे, त्यावेळी आम्ही कामाची सुरुवात संगणकावर केली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘लोकमान्य’मध्ये 75 टक्के महिला काम करत आहेत. सध्या देशातील 4 राज्यात 213 शाखा असून 10 लाख ग्राहक आहेत. सुरक्षितता, विश्वासार्हता, पारदर्शकता, व्यावसायिकता या चतुःसूत्रीवर आम्ही काम करत असल्याचे सांगत, बँकांनी निकोप दृष्टिकोनातून आणि लोकाभिमुख काम केले पाहिजे. आमच्या यशात अनेकांचे मार्गदर्शन मिळाल्याचेही किरण ठाकुर यांनी आवर्जून सांगितले.