लाट टाळण्यासाठी निर्बंध कठोर करा : आरोग्य सल्लागार डॉ.सुभाष साळुंखे यांची सूचना
प्रतिनिधी / सांगली
राज्यात अन्य जिल्ह्यातील रूग्णसंख्या कमी होत असतानाच सांगली जिल्ह्याची संख्या मात्र कमी होत नाही. ही बाब चिंताजनक आहे. अशीच स्थिती राहिली तर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट जिल्ह्यात येणारच अशी भिती राज्याचे आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी व्यक्त केली. प्रशासनाने निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करावी, नागरिकांनीही वर्तन तिसरी लाट रोखण्यासाठी योग्य ठेवावे, असे आवाहनही केले.
जिल्ह्यात ऑक्सिजन, स्टिरॉईड, अनुषंगिक औषधे यांचा बफर स्टॉक ठेवा, असा सल्लाही यांनी दिला. जिल्ह्यात परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूनही रूग्णसंख्या कमी होत नसल्याने तिसरी लाट अटळ आहे. या अनुषंगाने पाहणी करुन जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित यंत्रणांची बैठक घेतली.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे व विविध तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, जिह्यात आरोग्याच्या पायाभूत सुविधा चांगल्या आहेत. संवाद यंत्रणा चांगली आहे. लोकांचा आरोग्य यंत्रणेबरोबरचा संपर्क चांगला आहे. कोविड कंट्रोल रूमची संकल्पनाही चांगल्या पद्धतीने राबविली जात आहे. यामधून उपलब्ध होणारा डाटा महत्वपूर्ण ठरत आहे. क्रीडा संकुल येथील कोविड सेंटर उत्तम पद्धतीने कार्यरत आहे. तरीही कोरोना रूग्णसंख्येत घट न होणे चिंतेचे आहे. लोकांची कोविड बद्दलची भिती कमी झाली होम आयसोलेशनच्या आग्रहामुळे जिह्यात रूग्णसंख्या कमी झाली नाही. त्यामुळे कम्युनिटी आयसोलेशन, संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याची सूचना केली.
जिल्ह्याचा टेस्टिंग दर चांगला
राज्याच्या तुलनेत सांगली जिल्ह्याचा टेस्टिंग दर चांगला आहे. खाजगी लॅबमधील टेस्टींग आणि रिपोर्टींगवर नियंत्रण आवश्यक आहे. खाजगी रूग्णालयातून होणाऱ्या एचआरसीटी चाचण्यावरही अंकुश ठेवणे आवश्यक आहे.
कंटेनमेंट झोन प्रभावहीन
कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी दुसऱ्या टप्प्यात प्रभावहीन झाली आहे. यापुढे अंमलबजावणी काटेकोरपणे झालीच पाहिजे. पोलीस, महसूल प्रशासन, ग्राम दक्षता समिती यांनी जबाबदारी पार पाडावी. तरच रूग्णसंख्या कमी होवू शकेल. ग्रामदक्षता समितीने सुपर स्प्रेडर शोधून त्यांचे तातडीने लसीकरण करावे.
रूग्णसंख्या वाढीला यंत्रणाच जबाबदार
शहरी भागात लोकसंख्येच्या घनतेमुळे रूग्णसंख्या वाढीचा दर जास्त आहे. याला तालुका आरोग्य यंत्रणेबरोबरच नगरपालिका व महानगरपालिकांची यंत्रणाही जबाबदार आहे. रूग्ण किती दिवस उपचाराखाली राहिला याचा डाटा संग्राह्य ठेवून कोमॉर्बिड रूग्णांवर सतत निरीक्षण ठेवा. ऑक्सिजन, कॉन्सट्रेटर, व्हेंटीलेटर अनुषंगिक औषधे, साहित्य, पुरेसे मनुष्यबळ यांचे काटेकोर नियोजन ठेवणे तिसऱया लाटेच्या अनुषंगाने अनिवार्य असल्याचे डॉ. सुभाष साळुंखे सांगितले.